जामसंडे येथे सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी करंडक कबड्डी स्पर्धेत मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी यांनी पुरुष विभागात, तर कोल्हापूर, यवतमाळ, अमरावती, नागपूर संघांनी महिला विभागात आगेकूच केली आहे.
पुरुषांच्या ‘अ’ गटात मुंबई उपनगरने नंदुरबारचा ४०-१२ असा धुव्वा उडवला. शैलेश गारळे, योगेश सावंत यांच्या चढाया, त्याला मिळालेली अमर निकाते, सुदेश कुळे यांच्या पकडीची साथ यामुळे हे शक्य झाले. नंदुरबारचा निवृत्ती जगताप एकाकी लढला. ‘ड’ गटात मुंबईने नागपूरला २२-१० असे पराभूत केले. श्रीभारतीचा अष्टपलू खेळ त्याला संकेत सावंतच्या चढाया व नितीन विचारेची पकडीची
साथ यामुळे मुंबईने हा विजय साकारला.
रायगडने चंद्रपूरचा २६-१४ असा पाडाव केला. राजन तांडेल, अनिकेत पाटील यांच्या चढाया, तर अनिकेत कोटेकर याच्या पकडी रायगडच्या विजयात महत्त्वाच्या ठरल्या.
महिलांच्या ‘ड’ गटात नागपूरने रायगडचा ४७-२४ असा पराभव केला. नागपूरकडून निकिता इंगळे, प्रियंका गजभिये यांच्या चढाया, तर निकिता तांदुरकरच्या पकडी या महत्त्वाच्या ठरल्या. रायगडकडून रेश्मा जाधव, प्रगती मुसळे यांनी कडवी झुंज दिली.