पंजाबवर एक डाव आणि ५० धावांनी वर्चस्व; मुशीरचे सामन्यात १० बळी

धरमशाला : डावखुरा फिरकीपटू मुशीर खान (५/५९) आणि कर्णधार आदित्य जेठवा (३/४०) यांनी दुसऱ्या डावातही केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर मुंबईने विजय र्मचट करंडक क्रिकेट स्पर्धेच्या (१६ वर्षांखालील) अंतिम सामन्यात पंजाबचा तब्बल एक डाव आणि ५० धावांनी धुव्वा उडवून विजेतेपदावर मोहोर उमटवली.

मंगळवारच्या ८ बाद ३३० धावांवरून पुढे खेळताना मुंबईचा पहिला डाव ३४३ धावांवर आटोपला. दुसऱ्या दिवसअखेर नाबाद असणाऱ्या आदित्य पवारने मुंबईसाठी सर्वाधिक ८६ धावा केल्या. त्यामुळे मुंबईला २०१ धावांची आघाडी मिळवण्यात यश आले.

प्रत्युत्तरात मुशीर आणि आयुषच्या फिरकीपुढे पंजाबचा दुसरा डाव घसरला. जसकिरत सिंग (३६) आणि उदय सहरान (२१) यांनी दुसऱ्या गडय़ासाठी रचलेल्या ४६ धावांच्या भागीदारीनंतर पंजाबची १ बाद ४८ वरून ७ बाद ९८ अशी त्रेधातिरपीट उडाली. अखेरीस अर्जुन दाणीने सिद्धांत तिवारीला धावचीत करून मुंबईच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. पंजाबचा दुसरा डाव १५१ धावांत संपुष्टात आला. मुशीरने दोन्ही डावांत मिळून १०१ धावांच्या मोबदल्यात १० बळी मिळवण्याची किमया साधली.

संक्षिप्त धावफलक

’ पंजाब (पहिला डाव) : १४२

मुंबई (पहिला डाव) : १२१.२ षटकांत सर्व बाद ३४३ (आदित्य पवार ८६, स्वयम वाघमारे ६४; इमनजोत सिंग ४/११६)

’ पंजाब (दुसरा डाव) : ६१ षटकांत सर्व बाद १५१ (आदित्य नाबाद ३९, जसकिरत सिंग ३६; मुशीर खान ५/५९, आयुष जेठवा ३/४०).

मुशीरच्या समावेशामुळे मुंबईचा संघ बलवान झाला. त्याचप्रमाणे प्रत्येकाने या विजयात सातत्याने योगदान दिले. आयुषचे नेतृत्व कौतुकास्पद होते. सरावाला पुरेसा वेळ मिळालेला नसतानाही खेळाडूंनी कोणतीही तक्रार न करता विजेतेपद मिळवून दाखवल्यामुळे मला प्रशिक्षक म्हणून त्यांचा अभिमान वाटतो. त्याशिवाय रोहितनेही वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावून माझा आनंद द्विगुणित केल्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी फारच संस्मरणीय ठरला आहे.

– दिनेश लाड, मुंबईचे प्रशिक्षक