तहानलेल्या प्रेक्षकांच्या साक्षीने खेळाडूंची परवड; सत्कार सोहळ्यामुळे स्पर्धा अडीच वाजता निकाली

पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमवर झालेली वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष व महिला शरीरसौष्ठव स्पर्धा फक्त प्रेक्षकांमुळे यशस्वी झाली आहे, असे एकीकडे सूत्रसंचालक व्यासपीठावरून सांगत उपस्थितांच्या टाळ्या कमवत होता. मात्र तहानलेल्या प्रेक्षकांच्या साक्षीने खेळाडूंची परवड हे या स्पध्रेचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले. सत्कार सोहळ्यांमुळे स्पर्धा तब्बल साडेसात तास लांबली आणि मध्यरात्री अडीच वाजता ती निकाली ठरली. त्यामुळे प्रेक्षक आणि खेळाडूंना नेहमीच दुय्यम वागणूक मिळते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

सायंकाळी ५ वाजता या प्रतिष्ठेच्या स्पध्रेला प्रारंभ झाला, मात्र मध्यरात्री २:३० वाजेपर्यंत येथे जमलेल्या हजारो प्रेक्षकांना साधी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आयोजकांनी हात आखडता घेतला. केवळ या खेळाची आवड आणि त्याप्रति असलेली उत्सुकता यामुळे हे प्रेक्षक तहानभूक विसरून ७-८ तास सुनीत जाधवला ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ होताना पाहण्यासाठी जमले होते. पण सुनीतच्या जेतेपदाच्या हॅटट्रिकसाठी व्याकूळ असलेल्या या प्रेक्षकांची तहान अखेरीस भागलीच नाही. आयोजकांना अखेपर्यंत प्रेक्षकांसाठी पाण्याची सोय करावी, अशी सबुद्धी सुचली नाही. त्यात मान्यवरांच्या आभारप्रदर्शन करण्यासाठी खेळाडूंसह प्रेक्षकांना मध्यरात्री २:३० वाजेपर्यंत वेठीस धरण्याचा प्रताप त्यांनी केला.

पुण्यात ‘भारत-श्री’ स्पध्रेला युवकांकडून चांगला प्रतिसाद लाभला, परंतु स्वतची पाठ थोपटून घेण्यात मश्गूल झालेल्या पदाधिकाऱ्यांनी प्रेक्षकांकडेच दुर्लक्ष केले. रविवारी स्पध्रेच्या अंतिम फेरीसाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक जमले होते. केवळ पुण्यातूनच नव्हे, तर अन्य ठिकाणांहूनही प्रेक्षक आले होते. अशा वेळी आयोजकांनी त्यांच्यासाठी खाद्यपदार्थ आणि पिण्याचे पाणी ही प्राथमिक सोय करणे अपेक्षित होते. शिवाय बालेवाडी स्टेडियमपासून खाण्याची सोय बऱ्याच अंतरावर उपलब्ध आहे, याची जाण ठेवून स्टॉल्स उभे करण्याची जबाबदारीही आयोजकांची होती. मध्यरात्री स्पर्धा संपल्यानंतर प्रेक्षक पाण्यासाठी एकमेकांना गयावया करीत होते. याबाबत भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस चेतन पाठारे आणि कार्यकारी उपाध्यक्ष मदन कडू यांना विचारले असता, त्यावर उत्तर देणे त्यांनी महत्त्वाचे मानले नाही.

लक्षावधींचे सत्कार आणि कोटय़वधींचा खर्च!

प्रत्येक गटानंतरच्या आभारप्रदर्शन सोहळ्यामुळे खेळाडूंना बराच काळ व्यासपीठावर तात्काळत उभे राहावे लागत होते. या सत्कारमूर्तीसाठी चषक आणि मानचिन्ह देण्याकरिता आयोजकांनी १० ते १५ लाख रुपये खर्च केल्याचे सूत्रांकडून समजते. परंतु प्रायोजकांनी आखडता हात घेऊनही कोटय़वधी रुपये खर्चून ही स्पर्धा आयोजित करण्यात महासंघ यशस्वी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या रकमेत एखादी स्थानिक स्पर्धा सहज भरवता येऊ शकली असती किंवा या रकमेत पिण्याचे पाणी किंवा खाद्यपदार्थ याची व्यवस्था करता येऊ शकली असती, असे काही प्रेक्षकांचे म्हणणे होते.