२०२२ राष्ट्रकुल स्पर्धांत नेमबाजी क्रीडा प्रकार वगळण्यात आल्यामुळे नाराज झालेल्या भारतीय ऑलिम्पिक महासंघाने अखेरीस आपली शस्त्र म्यान केली आहेत. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय भारतीय ऑलिम्पिक महासंघाने रद्द केला असून, आता भारतीय खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील. याचसोबत नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत भारतीय ऑलिम्पिक महासंघाने २०२६ किंवा २०३० साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या यजमानपदाच्या शर्यतीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

“बैठकीत झालेल्या चर्चेनंतर आम्ही बर्मिंगहॅम स्पर्धांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय रद्द करत आहोत. भारतीय खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील. २०२६ किंवा २०३० च्या यजमानपदाच्या शर्यतीत भारत उतरणार आहे”, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सह-सचिव राजीव मेहता यांनी पत्रकारांना माहिती दिली. राष्ट्रकुल महासंघानेही भारताच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

बहिष्काराचा निर्णय रद्द केल्याच्या बदल्यात, राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेचं यजमानपद भारताला दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात भारत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या यजमानपदासाठी आपली दावेदारी कधी सादर करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.