ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३६९ धावांवर रोखल्यानंतर भारतीय संघाच्या पहिल्या डावाची सुरूवात अडखळती झाली. सलामीवीर शुबमन गिल अवघ्या ७ धावांवर झेलबाद झाला. अनुभवी रोहित शर्मा मोठी खेळी करणार अशी चाहत्यांना आशा होती. पण ४४ धावांवर असताना बेजबाबदार फटका खेळत बाद झाला. आपली १००वी कसोटी खेळणाऱ्या फिरकीपटू नॅथन लायनने रोहितला माघारी धाडलं. संयमी खेळी करण्याची गरज असताना रोहित शर्मा क्रीजमधून पुढे आला आणि त्याने हवाई फटका खेळला. लायनने सीमारेषेवर लावलेल्या फिल्डरने रोहितचा सहज झेल पकडत त्याला तंबूत धाडले. अनुभवी रोहित शर्मा बेजबाबदार फटका मारुन बाद झाल्यानंर त्याच्या टीकेची झोड उडाली आहे. सोशल मीडियापासून समालोचनापर्यंत सर्नांनीच रोहित शर्मावर टीकास्त्र सोडत नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार फलंदाज सुनील गावसकर यांनीही रोहित शर्मावर नाराजी व्यक्त केली आहे. बॉर्डर-गावसकर मालिकेदरम्यान 'चॅनल ७' वर सुनील गावसकर समालोचन करत आहेत. चौथ्या कसोटी सामन्यावेळीही गावसकर समालोचन करत असताना रोहित शर्मा खराब फटका मारुन बाद झाला. रोहितवर गावसकरांनी आपल्या खास शैलीत नाराजी व्यक्त केली. गावसकर म्हणाले, 'का? काय गरज होती? असा बेजबाबदार फटका मारायची गरज काय होती? लॉन्ग ऑन आणि डीप स्कवायर क्षेत्ररक्षक उपस्थित होते. चौकारानंतर लगेच मोठा फटका मारण्याची गरज होती का? सर्वात अनुभवी फलंदाज असताना असा फटका मारण्याची गरज नव्हती. आता कोणतेही कारण देऊन उपयोग नाही. गरज नसताना रोहितनं आपली विकेट टाकली. कसोटी क्रिकेटमध्ये चांगल्या सुरुवातीनंतर शतकात रुपांतर करावं लागतं. प्रतिस्पर्धी संघानी धावसंख्या ३६९ आहे, हे लक्षात ठेवायची गरज होती. सध्याचा भारतीय संघ नवखा आहे. या नव्या दमाच्या संघात अनुभवाची कमतरता आहे हे साऱ्यांनाच माहिती आहे. संघात अनेक खेळाडू अगदीच नवोदित आहेत. संघात अनुभवाची उणीव आहे हे माहिती असूनही रोहित शर्माने असा फटका मारायची गरज नव्हती.' Nathan Lyon's 397th Test wicket seemed to come out of nowhere and the Aussies were pumped! #OhWhatAFeeling #AUSvIND | @Toyota_Aus pic.twitter.com/rIhl4ZjbTu — cricket.com.au (@cricketcomau) January 16, 2021 रोहित शर्माने तो फटका खेळल्यानंतर सारेच चाहते नाराज झाले. एक चांगली सुरूवात मिळाल्यानंतर रोहितला अर्धशतकही पूर्ण करता आले नाही. रोहित शर्माने ७४ चेंडूंमध्ये ४४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत त्याने ६ चौकार लगावले. पण अतिशय खराब फटका खेळत तो बाद झाला. तिसऱ्या कसोटीतदेखील रोहित अर्धशतक पूर्ण करताच बेजबाबदार फटका खेळला होता. ५२ धावांवर असताना त्याने उसळता चेंडू हवेत टोलवला होता आणि मिचेल स्टार्कने त्याचा झेल घेतला होता. आजच्या त्याच्या खेळीवर सर्वांनी नाराजी व्यक्त केली आहे.