भारतात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका आता आयपीएल स्पर्धेलाही बसायला सुरुवात झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारनं परदेशी नागरिकांच्या व्हिसा नियमांमध्ये बदल केला आहे. १५ एप्रिलपर्यंत परदेशी नागरिकांना भारतात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यामुळे परदेशी खेळाडू १५ एप्रिलपर्यंत आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

दरम्यान अनेक राज्यांनी आयपीएलचे सामने पुढे ढकलावे यासाठी केंद्राला विनंती केली आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी १४ मार्चला आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक होणार आहे. या बैठकीत आयपीएलच्या भवितव्याबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे. “आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. सध्याच्या घडीला रणजी करंडक, अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड, इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड हे सर्व सामने ठरलेल्या वेळापत्रकानुसार होत आहेत. मुंबईत लोकल ट्रेन सुरु आहेत, शाळा-कॉलेजं पूर्णपणे ठप्प झालेलं नाही. आरोग्य मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आलेले सर्व उपाय आम्ही राबवत आहोत. मात्र या सर्व गोष्टींवर अंतिम निर्णय १४ तारखेच्या बैठकीत होईल”, गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली. दरम्यान आयपीएल सामन्यांचं आयोजन पुढे ढकलण्यात यावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आलेली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने यावर त्वरित सुनावणी करण्यास नकार दिला असून १६ मार्चरोजी ही याचिका सुनावणीसाठी येणार आहे.

आंतरराष्ट्रीय संघटनांचे पदाधिकारी, परदेशांचे राजदूत आणि काही महत्वाच्या व्यक्तींना व्हिसाचे नियम लागू नसतील. चीन, इटली, इराण, कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या सात देशांमधून भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांना १५ एप्रिलपर्यंत भारतात येता येणार नाहीये तसेच या देशांमधून मायदेशी परतणाऱ्या भारतीय व्यक्तींचीही कडक चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात गव्हर्निंग काऊन्सिल आयपीएल आणि परदेशी खेळाडूंच्या सहभागाबद्दल नेमकं काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.