भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी २०१९ साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे संकेत दिले आहेत. विश्वचषकाला सुरुवात होईपर्यंत भारतीय संघात आता कोणतेही बदल होणार नसल्याचं शास्त्री यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत पीटीआयशी बोलत होते. सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात निवड झालेल्या खेळाडूंनाच, विश्वचषकासाठी संघात विचार केला जाईल असं शास्त्री म्हणाले.

अवश्य वाचा – गोलंदाजी भारी पण, फलंदाजीत सुधारणा गरजेची – विराट

“फलंदाजीतली क्रमवारी, गोलंदाजीतले बदल या सर्व गोष्टींची वेळ आता संपली आहे. सध्या आम्ही निवडक १५ खेळाडूंसोबत खेळण्याच्या प्रयत्नात आहोत, हेच खेळाडू विश्वचषकासाठी भारतीय संघात असतील. सराव आणि प्रयोगाचा कालावधी आता उलटून गेला आहे.” ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्याआधी रवी शास्त्री यांनी संकेत दिले आहेत.

विश्वचषकाआधी आता आम्हाला अंदाजे १३ सामने खेळायला मिळणार आहेत. त्यामुळे या सामन्यांमध्ये चांगला खेळ करुन दुखापती होणार नाहीत याकडे आमचा भर असणार आहे. दुखापत झाल्यानंतर ऐनवेळी दुसरा पर्याय शोधणं ही गोष्ट मला टाळायची आहे. आगामी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड दौऱ्यात भारत हे १३ सामने खेळणार आहे. विश्वचषकाआधी आमचा हा सर्वात मोठा आणि महत्वाचा दौरा असल्यामुळे सध्या आमचं पूर्ण लक्ष या दौऱ्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याकडे असल्याचंही शास्त्री म्हणाले.