प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारसाठी यंदाच्या वर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(बीसीसीआय) कडून कोणाच्याही नावाची शिफारस करण्यात आलेली नाही. बीसीसीआयला या पुरस्कारासाठी कोणताही खेळाडू योग्य वाटला नसल्याने त्यांनी नाव पाठवला नसल्याचे समजते.
बीसीसीआयने धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीची अर्जुन पुरस्कारासाठी तर भारताचा महान कर्णधार सुनील गावस्करची ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. गेल्या वर्षी राहुल द्रविडच्या नावाची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली जाण्याची शक्यता होती. परंतु बीसीसीआयचे प्रतिनिधी रवी शास्त्री पुरस्कार समितीच्या बैठकीला हजर राहू न शकल्यामुळे द्रविडचा पुरस्कारासाठी विचार करण्यात आला नव्हता. या बैठकीसाठी आपल्याला क्रीडा मंत्रालयाकडून बोलावणेच आले नसल्याचे नंतर शास्त्री यांनी स्पष्ट केले होते. लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि नेमबाज विजय कुमार यांना गेल्या वर्षी खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता.