शनिवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 वन-डे सामन्यांची मालिकेला सुरुवात होणार आहे. मात्र सीमेवर भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावामुळे या मालिकेतील मोहाली आणि दिल्ली या अखेरच्या दोन सामन्यांची ठिकाणं बदलण्यात येणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सी.के.खन्ना यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. दिल्ली आणि मोहाली सामन्यांची ठिकाणं बदलण्याचा बीसीसीआयचा कोणताही विचार नसल्याचं खन्ना यांनी स्पष्ट केलं आहे.

अवश्य वाचा – टीम इंडिया नवीन रुपात मैदानावर येणार, पाहा नव्या जर्सीचे फोटो…

10 मार्चरोजी मोहालीच्या मैदानात चौथा तर 13 मार्चरोजी दिल्लीत अखेरचा सामना रंगणार आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने या दोन सामन्यांपैकी एक सामना आपल्या मैदानावर खेळवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र मालिकेच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नसून, मोहाली आणि दिल्लीचे सामने ठरलेल्या वेळेनुसार पार पडतील. खन्ना पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते.

अवश्य वाचा – IND vs AUS : पहिल्या वन-डे सामन्याआधी भारताच्या गोटात चिंता, सरावादरम्यान धोनीला दुखापत