विश्वचषकात भारताविरोधात खेळताना संयम आणि शांततेत खेळण्याचा सल्ला इम्रान खान यांनी पाकिस्तान संघाला दिला आहे. १६ जून रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना रंगणार आहे. जगभरताली क्रिकेटप्रेमी या सामन्याची अतुरतेनं वाट पाहत आहेत.

कप्तान सरफराज आणि त्याच्या पाकिस्तान संघाने भारताचं गडी बाद झाल्यानंतर वेगळ्या पद्धतीनं आनंद साजरा करू द्यावा, असा प्रस्ताव पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे पाठवला होता. त्यावर इम्रान खान यांनी पाक संघाला शांततेत खेळण्याची सूचना केली आहे. तसेच सामन्यादरम्यान खेळाडूंनी जशास तसे हा दृष्टीकोन न ठेवता फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावे, असाही सल्ला इम्रान खान यांनी पाकिस्तानी संघाला दिला आहे. पाकिस्तान सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘मुंबई मिरर’शी बोलताना ही माहिती दिली होती.

मार्चमध्ये रांचीत झालेल्या ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात भारतीय संघानं पुलवामा शहिदांना श्रृद्धांजली म्हणून लष्करी कॅप परिधान केली होती. त्यावेळी पाकिस्तानने भारत खेळाला वेगळाच रंग देत असल्याचा आरोप करत विरोध दर्शवला होता. यालाच कृतीतून उत्तर देण्याचा पाक संघाचा इरादा होता. मात्र, स्वत: एक खेळाडू म्हणून कारकिर्द गाजवलेले इम्रान खान यांनी पाक संघाला अशा प्रकारचे कोणतेही पाऊल उचलण्याची मनाई केली असल्याचेही आधिकाऱ्यानं सांगितलं.

दरम्यान, अशाप्रकराचे काहीही बदल करायचे असल्यास आयसीसीची परवानगी घ्यावी लागते. यासाठी काही नियमही निश्चित करण्यात आले आहेत. पाकिस्तानने मात्र अशी कोणतीही परवानही मागितली नसल्याचे आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मार्च महिन्यात लष्करी कॅप घालण्यापूर्वी भारतीय संघानं आयसीसीची परवानगी घेतली होती.