न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सराव सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने सहा गडी राखून भारताने दिलेलं आव्हान पूर्ण करत आपल्या विश्वचषकाची सुरुवात चांगली केली. यातुलनेत भारताची फलंदाजी पहिल्या सामन्यात पुरती कोलमडली. रविंद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्याचा अपवाद वगळता भारताचे फलंदाज फारशी आश्वासक खेळी करु शकले नाहीत. मात्र या पराभवानंतरही रविंद्र जाडेजा आशावादी आहे. भारताला फलंदाजीची चिंता करण्याची गरज नसल्याचं जाडेजाने म्हटलं आहे. रविंद्रने पहिल्या सराव सामन्यात अर्धशतकी खेळी करत भारताला १७९ धावांचा टप्पा गाठून दिला.

“हा आमचा पहिला सराव सामना होता. पहिल्या सामन्यातल्या कामगिरीवरुन तुम्ही खेळाडूंच्या कामगिरीचं परिक्षण नाही करु शकत. त्यामुळे माझ्यामते फलंदाजीविषयी चिंता करण्याचं काही कारण नाहीये. भारतामधून इंग्लंडमध्ये आल्यावर पाटा खेळपट्ट्यांवर खेळताना सुरुवातीला कठीण जातचं. यामधून सावत स्वतःचा खेळ सुधारण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे. टीम इंडियातला प्रत्येक फलंदाज हा अनुभवी आहे.” सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जाडेजा बोलत होता.

अवश्य वाचा – विराटच्या मदतीसाठी मी नेहमी तयार – रोहित शर्मा

दरम्यान सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना, रविंद्र जाडेजाचा (५४) अपवाद वगळता भारताच्या अन्य फलंदाजांनी सपशेल निराशा केली. जाडेजाच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताला १७९ धावांचा टप्पा गाठता आला. अर्धशतकी खेळीत जाडेजाने सहा चौकार आणि दोन षटकार लगावले. कर्णधार विराट कोहलीसह सलमीवीर रोहित शर्मा, शिखर धवन आणि लोकेश राहुल स्वस्तात बाद झाले.

हार्दिक पांडयाने (३०) थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. एम एस धोनी (१७) आणि दिनेश कार्तिक (४) फारशी चमक दाखवू शकले नाहीत. पांडया आणि कार्तिकला नीशामने तर धोनीला साऊदीने बाद केले. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बाऊल्टने भेदक मारा करत रोहित (२), शिखर (२) आणि राहुलला (६) स्वस्तात बाद केले.

अवश्य वाचा – अखेरच्या फळीतल्या खेळाडूंनीही फलंदाजीची जबाबदारी घ्यावी – विराट कोहली