करोनाच्या तडाख्यामुळे सध्या क्रिकेट बंद आहे, पण गेल्या वर्षी हा दिवस वेस्ट इंडिज क्रिकेट चाहत्यांसाठी दु:खदायक ठरला होता. World Cup 2019 मध्ये २७ जूनला वेस्ट इंडिजविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात भारताने १२५ धावांनी विजय मिळवला होता. कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजपुढे २६८ धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांपुढे शरणागती पत्करली. भारताच्या या विजयामुळे वेस्ट इंडिजचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

असा रंगला होता सामना

सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहली याने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. १८ धावांवर रोहित शर्मा बाद झाल्यावर विराट कोहलीच्या साथीने सलामीवीर राहुलने सावध खेळ करण्यास सुरुवात केली आणि ११ व्या षटकात भारताचे अर्धशतक साकारले. लोकेश राहुल ६ चौकार लगावत ६८ चेंडूत ४८ धावांवर बाद झाला. कॅप्टन कोहलीने मात्र दमदार अर्धशतक ठोकले. धोनी आणि विराट यांच्यात भागीदारी होत असताना कर्णधार कोहली (७२) तंबूत परतला. त्यानंतर हार्दिक पांड्याने धमाकेदार ४६ धावांची खेळी केली. तर धोनीने शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केले आणि भारताला २६८ धावांपर्यंत मजल मारून दिली.

२६९ धावांचा पाठलाग करताना धोकादायक ख्रिस गेल मोठा फटका खेळून माघारी परतला. त्याने अत्यंत संथ खेळ करत १९ चेंडूत ६ धावा केल्या. लगेचच मोहम्मद शमीने शाय होपचा त्रिफळा उडवला आणि विंडीजला दुसरा धक्का दिला. होपने १० चेंडूत ५ धावा केल्या. पाठोपाठ हार्दिक पांड्यानेही विंडीजची जमलेली जोडी फोडली त्याने अँब्रिसला ३१ धावांवर माघारी धाडले. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पूरन बाद. विंडीजचे खेळपट्टीवर जम बसवलेले दोन्ही फलंदाज माघारी परतले. पूरनने २८ धावा काढल्या. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर युझवेन्द्र चहलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने १३ चेंडूत ६ धावा केल्या. बुमराहने २ चेंडूवर २ बळी टिपल्यानंतर वेस्ट इंडिजच्या डावाला गळती लागली आणि भारताने सामना सहज जिंकला.

दमदार खेळ करणारा विराट कोहली सामनावीर ठरला.