ऋषभ पंतची यष्टींमागे होत असलेली सुमार कामगिरी आणि फलंदाजीतलं अपयश पाहता, निवड समितीने बांगलादेश दौऱ्यात संजू सॅमसनला संघात जागा दिली. मात्र एकही सामना न खेळवता निवड समितीने विंडीजविरुद्ध मालिकेत सॅमसनला वगळलं. या निर्णयावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे निवड समितीने संजू सॅमसनला संघात स्थान दिलं. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना, संजू सॅमसनने आपण भारताकडून यष्टीरक्षक करण्यासाठी सज्ज असल्याचं म्हटलं आहे.

“केरळ संघाकडून खेळत असताना, गेल्या ५-६ वर्षांपासून मी यष्टीरक्षण करतोय. वन-डे आणि रणजी अशा दोन्ही स्पर्धांचा अनुभव मला आहे. संघाला जशी गरज आहे, तशी भूमिका निभावण्यासाठी मी तयार आहे. आयपीएलमध्येही ज्यावेळी संघाला माझी यष्टीरक्षक म्हणून गरज होती, त्यावेळी मी तसं केलं. काहीवेळा माझी संघाला क्षेत्ररक्षक म्हणून गरज होती, त्यावेळी मी देखील काम केलं. त्यामुळे मी कोणत्याही संघाकडून खेळताना मी दोन्ही भूमिकांसाठी तयार असतो आणि यापुढेही राहिन”, IANS वृत्तसंस्थेशी संजू बोलत होता.

दरम्यान माजी खेळाडू व्ही.व्ही.एस.लक्ष्मणनेही ऋषभ पंतला आपली संघातली निवड सार्थ ठरवावी लागेल असं म्हटलं आहे. “माझ्यामते संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने ऋषभ पंतला एक संदेश दिला आहे की तुझ्या जागेसाठी संजू सॅमसनच्या रुपाने पर्याय तयार आहे. आतापर्यंत ऋषभला योग्य आणि पुरेश्या संधी दिल्या गेल्या आहेत, याबद्दल संघ व्यवस्थापनात नक्कीच चर्चा होत असेल. मात्र अखेरीस ऋषभला त्याची संघातली निवड सार्थ ठरवावी लागेल, नाहीतर पंत त्याची जागा घेईल”, लक्ष्मण Star Sports वाहिनीवरील कार्यक्रमात बोलत होता.

अवश्य वाचा – ऋषभला संघात स्वतःची निवड सार्थ ठरवावी लागेल, नाहीतर… – व्ही.व्ही.एस.लक्ष्मण