IPL च्या तेराव्या हंगामाचं आयोजन यंदा युएईत करण्यात आलेलं आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. करोनामुळे जगभरात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदा प्रवासादरम्यान सर्व खेळाडूंना मास्क, सोशल डिस्टन्सिंग व बीसीसीआयच्या अन्य मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं लागणार आहे. IPL च्या आतापर्यंतच्या इतिहासात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. आतापर्यंत अनेकदा RCB ने हातात आलेले सामने अखेरच्या षटकात हाराकिरी करुन गमावले आहेत. RCB चा महत्वाचा गोलंदाज युजवेंद्र चहलने आपल्या संघाच्या खराब कामगिरीमागचं कारण सांगितलं आहे.

“मी गेली ६ वर्ष RCB कडून खेळतो आहे. माझ्या दृष्टीकोनातून आमच्या संघासाठी खरी समस्या ही अखेरच्या षटकांतली गोलंदाजी ही आहे. १६-१७ व्या षटकापर्यंत आमची सामन्यावर पकड असते. पण अखेरच्या ३ षटकांतल्या गोलंदाजीमुळे आम्ही आतापर्यंत ३० टक्के सामने गमावले असतील. अनेकदा १६ व्या षटकापर्यंत आम्ही प्रतिस्पर्धी संघाला १३० पर्यंत रोखून ठेवतो. त्यामुळे अखेरच्या ३ षटकांत फटकेबाजी गणित पकडलं तर प्रतिस्पर्धी संघाने फारफार तर १६० पर्यंतचा पल्ला गाठायला हवा. पण अनेकदा आम्ही अखेरच्या ३ षटकांत खूप धावा देतो ज्यामुळे प्रतिस्पर्धी संघ १९०-२०० पर्यंत मजल मारतो. इथेच सामन्याचं चित्र पालटतं.” भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्राशी बोलत असताना चहलने आपले विचार मांडले.

अवश्य वाचा – IPL 2020 : UAE मध्ये Bio Secure Bubble तयार करण्याचं कंत्राट UK मधील कंपनीला

आयपीएलच्या इतिहासात RCB ची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही, त्यामुळे विराटच्या नेतृत्वाखाली RCB चा संघ यंदा चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : क्वारंटाइन झालेल्या RCB खेळाडूंनी हॉटेलमध्ये सुरु केला सराव