पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे चर्चेत आहे. सुरूवातीला अख्तरने करोना विषाणूशी लढण्यासाठी भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका खेळवून मदत निधी उभारण्याची कल्पना सांगितली होती. त्याच्या या कल्पनेला पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी पाठींबा दिला होता, पण भारतातील माजी क्रिकेटपटूंनी मात्र त्याला सरळ विरोध दर्शवला. काही दिवसांनी अख्तरने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आपले मत व्यक्त केले. त्यानंतर आता अख्तरने थेट भारताच्या क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

विराटला गोलंदाजी की बुमराहसमोर फलंदाजी? महिला क्रिकेटपटूने दिलं हे उत्तर

शोएब अख्तरने हॅलो अ‍ॅपवरून खास संवाद साधला. त्यावेळी त्याने मुलाखतीत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. अख्तरने मुलाखतीमध्ये भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली. “भारतीय क्रिकेट संघात चांगले गोलंदाज आहेत. बुमराह आणि भुवनेश्वर कुमार सध्याच्या घडीला सर्वोत्तम आहेत. जर मला संधी मिळाली, तर मला भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक बनायला आवडेल. कारण मला भारतातही माझ्यासारखेच वेगवान गोलंदाज तयार करायचे आहेत. जर मला IPL मध्ये प्रशिक्षक म्हणून संधी मिळाली, तर कोलकाता संघाच्या खेळाडूंना प्रशिक्षण द्यायला आवडेल”, असे शोएब अख्तर म्हणाला.

 

चहलचं टोपणनाव माहिती आहे का?

शोएब अख्तरने टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याचे कौतुक केले. हार्दिक पांड्याकडे जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू बनण्याची क्षमता आहे. शोएब अख्तरने सचिन आणि राहुल द्रविडबाबतही महत्त्वाची गोष्ट सांगितली. सचिन आणि सुनील गावसकर हे महान खेळाडू होते. पण सचिनपेक्षा द्रविडला बाद करणं अधिक कठीण होतं, असंही अख्तर म्हणाला.