पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद खान यांनी, भारतीय क्रिकेट संघावर कारवाई करण्यासाठी आयसीसीला साकडं घातलं आहे. पुलवामा हल्ल्यात हौतात्म्य स्विकारलेल्या जवानांबद्दल आदर दाखवण्यासाठी भारतीय संघ ‘आर्मी कॅप’ घालून मैदानात उतरला. यावेळी भारतीय संघाने एका सामन्याचं मानधन लष्कर मदत निधीला देत सर्व देशवासियांनाही यामध्ये सहभाग घ्यायला सांगितला. मात्र भारतीय संघाचं हे काम पाकिस्तानच्या डोळ्यात खुपलं आहे. खेळाचं राजकारण केल्याप्रकरणी भारतीय संघावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाकचे मंत्री फवाद चौधरी यांनी केली आहे.

“आर्मी कॅप घालून भारतीय संघाने क्रिकेटमध्ये राजकारण घुसवण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबद्दल आयसीसीकडे तक्रार दाखल करावी. जर भारतीय संघाने आर्मी कॅप घालणं थांबवलं नाही, तर पाकिस्तान संघही विश्वचषकात, काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधात काळ्या फिती लावून मैदानात उतरेल.” डॉन वृत्तपत्राशी बोलत असताना फवाद चौधरी यांनी आपलं मत मांडलं. याचसोबत पाकिस्तानमधील प्रसिद्ध पत्रकार ओवैस तोहीद, मझहर अब्बास यांनीही भारतीय संघाच्या या कृत्याबद्दल नापसंती दर्शवली आहे.

अवश्य वाचा – Video : मराठमोळ्या केदार जाधवने राखला ‘आर्मी कॅप’चा मान ! धोनीला केला कडक सॅल्युट

पुलवामा हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. यानंतर विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी मागणी जोर धरत होती. बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकटं पाडण्याचे प्रयत्न केले. मात्र आयसीसीने बीसीसीआयच्या मागणीवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे या प्रकरणात पुढे नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS: भारतीय संघाची पुलवामा शहिदांना श्रद्धांजली, ‘आर्मी कॅप्स’ घालून मैदानात