महाराष्ट्राच्या आकांक्षा व्होरा हिने ८०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत स्पर्धाविक्रम नोंदवत सुवर्णपदक मिळवले व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोमवारी उल्लेखनीय कामगिरी केली. महाराष्ट्राच्या महिलांनी जलतरणाच्या ४ बाय १०० मीटर मिडले रिलेमध्ये सुवर्णपदक पटकावले. आकांक्षाची सहकारी हृतिका श्रीराम हिने हायबोर्ड डायव्हिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले. हरयाणाने ११ सुवर्ण, ३ रौप्य व १ कांस्यपदकांसह आघाडी घेतली. सेनादल (८ सुवर्ण, २ रौप्य व ४ कांस्य) व महाराष्ट्र (७ सुवर्ण, ९ रौप्य व ३ कांस्य) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.
आकांक्षा हिने ८०० मीटरचे अंतर ९ मिनिटे १५.३० सेकंदांत पार केले व रिचा मिश्रा हिने २०११ मध्ये नोंदवलेला ९ मिनिटे २४.४५ सेकंद हा विक्रम मोडला. याच शर्यतीत महाराष्ट्राच्या मोनिका गांधीला कांस्यपदक मिळाले. ४ बाय १०० मीटर मिडले रिलेत सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राच्या संघात आरती घोरपडे, मोनिका गांधी, ज्योत्स्ना पानसरे व आदिती घुमटकर यांचा समावेश होता. २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये महाराष्ट्राच्या ऋतुजा उदेशी हिला कांस्यपदक मिळाले. पुरुषांच्या १५०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत सौरभ संगवेकर याला रौप्यपदक मिळाले. डायव्हिंगमध्ये हृतिका श्रीराम हिने २३० गुणांसह विजेतेपद मिळविले. दीप्ती पन्वर हिने २२१ गुणांसह रौप्यपदक जिंकले.
टेबल टेनिसमध्ये महिला सांघिक प्रकारात मधुरिका पाटकर, मल्लिका भांडारकर, चार्वी कवळे, सेनहोरा डिसुझा, पूजा सहस्रबुद्धे, श्वेता पार्टे आणि प्रीती मोकाशी यांच्या संघाने सुवर्णपदक पटकावले. पुरुष संघाला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
नेमबाजीत महाराष्ट्राच्या अंजली भागवतने १० मीटर एअर रायफलमध्ये आयोनिका पॉल व पूजा घाटकर यांच्या साथीने सांघिक विभागात सुवर्णपदक जिंकले. त्यांनी १२४१ गुण मिळविले. वैयक्तिक विभागात पूजाने सुवर्णपदक मिळवताना आयोनिकावर मात केली. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी २०८.१ गुण मिळविले. त्यानंतर टायब्रेकरमध्ये पूजाने अव्वल कामगिरी केली. तसेच कुस्तीमध्ये महाराष्ट्राच्या महेश मोहोळला ९८ किलो विभागात रौप्यपदक मिळाले.
खो-खो : महाराष्ट्राची आगेकूच  
राष्ट्रीय क्रीडा स्पध्रेतील श्रीपादम् स्टेडियम सुरू असलेल्या खो-खो स्पध्रेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. पुरुषांच्या ‘अ’ गटातील सामन्यात महाराष्ट्राने पुड्डचेरीचा  २२-६ असा एक डाव व १६ गुणांनी धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या अमोल जाधवने २.३० मि. संरक्षण करून आक्रमणात ४ गडी टिपले. महिलांच्या ‘ब’ गटातील सामन्यात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशवर ८-४ अशी एक डाव व ४ गुणांनी मात केली. प्रियांका येळे (४ मि.), सारिका काळे (३.३० मि. नाबाद), श्वेता गवळी (३.३० मि.), सुप्रिया गाढवे (३.३० मि.), कविता घाणेकर (२.३० मि.), श्रुती सकपाळ (२ मि. नाबाद) व मीनल भोईर (३ गडी) या विजयाच्या प्रमुख शिल्पकार होत्या.