फिरकीपटू पूनम यादव हिच्या चार बळींच्या जोरावर भारताने यजमान ऑस्ट्रेलियाला धावांनी पराभूत केले. जेमायमा रॉड्रीग्ज (२६) आणि दिप्ती शर्मा (४९*) या दोघींच्या भागीदारीच्या जोरावर भारताने २० षटकात ४ बाद १३२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला १३३ धावांचे आव्हान दिले. आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर हेली हिने अर्धशतकी केली, पण पूनम यादवच्या फिरकीपुढे यजमान ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. या विजयासह भारताने स्पर्धेत विजयी सलामी दिली.

स्पर्धेत पूनमने ४ बळी घेत सामना फिरवला. या दमदार विजयाबाबत बोलताना पूनम यादवची आई मुन्नी देवी म्हणाली, “भारताच्या विजयाने मी खूप आनंदी आहे. मला टीम इंडियाच्या आजच्या विजयाचा खूप अभिमान आहे. महिला संघाने सामन्यात सुरूवात थोडीशी खराब केली होती, पण अखेरीस त्यांनी सामना जिंकला याचं मला समाधान वाटतं.”

दरम्यान, भारताकडून दिप्ती शर्माने शेवटपर्यंत झुंज देत नाबाद ४९ धावा केल्या. तर मुंबईकर रॉड्रीग्जने ३३ चेंडूत २६ धावा केल्या. आपला पहिला टी २० विश्वचषक सामना खेळणाऱ्या शफाली वर्मानेदेखील धमाकेदार खेळी करत ५ चौकार आणि १ षटकार लगावले. पण १५ चेंडूत २९ धावा करून ती बाद झाली. पूनम यादवने ४, शिखाने ३ तर गायकवाडने १ बळी टिपला.

१३३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सलामीवीर हेली हिने दमदार अर्धशतक ठोकले. हेलीने ३५ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह ५१ धावा केल्या. पण त्यानंतर ती लगेचच झेलबाद झाली. फिरकीपटू पूनम यादवने आपला अनुभव पणाला लावत दोन चेंडूत दोन बळी टिपले. तिने आधी रॅचेल हेन्सला (६) बाद केले. तर त्यानंतर दमदार फलंदाज एलिस पेरीला पहिल्याच चेंडूवर तंबूत धाडले. पण तिची हॅटट्रिक यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे हुकली. तिने टाकलेला चेंडू बॅटला लागला पण किपरला तो झेलता आला नाही. त्यामुळे तिला हॅटट्रिक मिळवता आली नाही. पण तसे असले तरी भारताने मात्र विजयाची हॅटट्रिक केली.