भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याचे काळे ढग आता दाटून आले आहेत. क्रिकेट या खेळाची विश्वासार्हता टिकवण्यासाठी श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा आणि आसाम क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांनी केली आहे.
‘‘स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामुळे क्रिकेट या खेळाला काळीमा फासला गेला आहे. त्याचबरोबर या खेळावर प्रेम करणाऱ्या कोटय़वधी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर लोकांचा या खेळावर पुन्हा विश्वास बसेल, अशी आशा आहे,’’ असे कंपनी व्यवहार मंत्री सचिन पायलट यांनी सांगितले.
‘‘श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यायला हवा. अन्य पर्याय येथे नाही. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग असलेला श्रीनिवासन यांचा जावई जर यात सामील असेल तर, त्यांनी राजीनामा दिल्याशिवाय ही चौकशी पारपदर्शीपणे होऊ शकणार नाही,’’ असे मत गोवा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष शेखर सलकार यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, ‘‘बीसीसीआयची प्रतिष्ठा राखण्यासाठी त्यांनी राजीनामा द्यायला हवा. जर त्यांनी खरेच काही चुकीचे केले नसेल तर ते पुन्हा बीसीसीआयचे अध्यक्ष होऊ शकतील. परंतु चौकशी संपेपर्यंत तरी त्यांनी पदाचा त्याग करावा.’’
आसाम क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम रॉय यांनी सांगितले की, ‘‘निष्पक्षपातीपणा जपण्यासाठी चौकशी सुरू असेपर्यंत श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदापासून दूर राहावे, असे माझे वैयक्तिक मत आहे.’’

श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा -शिर्के
मयप्पनला अटक केल्यानंतर एन. श्रीनिवासन यांनी एकही बैठक घेऊन चर्चा केलेली नाही. त्यामुळे त्यांनी या प्रकरणामुळे राजीनामा द्यावा, असे मत बीसीसीआयचे खजिनदार अजय शिर्के यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, प्रकरण कुठलेही असो कार्यकारिणी सामितीची बैठक बोलवायलाच हवी. जेव्हा खेळाडूंना अटक केली तेव्हा बोर्डाने बैठक घेतली होती. पण गुरुनाथच्या प्रकरणावर कुठहीली बैठक किंवा चर्चा झालेली नाही. जर मी त्यांच्या जागी असतो आणि असे माझ्याबाबतीत झाले असते तर हे प्रकरण संपेपर्यंत मी या पदापासून लांब राहिलो असतो.
श्रीनिवासन यांनी स्वत:हून पायउतार व्हावे -लेले
मुंबई : ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाच्या पाश्र्वभूमीवर बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वत:हूनच पायउतार व्हावे. अन्यथा, अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात येईल, असे बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले यांनी सांगितले.