न्यूझीलंडमध्ये पार पडलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देणारा पृथ्वी शॉ सध्या चांगलाच चर्चेत आहे. स्थानिक सामन्यांमध्ये घातलेला धावांचा रतीब आणि विश्वचषकात भारतीय संघाचं नेतृत्व करुन मिळवलेलं विजेतेपद यामुळे आयपीएलमध्ये पृथ्वीवर चांगल्या रकमेची बोली लागली आहे. पण या सर्व गोष्टींनंतर पृथ्वी भारताच्या सिनिअर संघाकडून खेळण्यासाठी तयार आहे. खुद्द पृथ्वीनेच याची कबुली दिली आहे. भारताच्या सिनिअर संघात मिळणाऱ्या संधीबद्दल विचारलं असता पृथ्वी म्हणाला, “हो, आता मला संघात जागा मिळण्यास काहीच हरकत नाही. फक्त यासाठी मला कामगिरीत सातत्य राखून सतत धावा काढणं गरजेचं आहे. मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं केल्यासं मलाही सिनिअर संघात लवकरच जागा मिळेलं.”

मुंबईकडून रणजी क्रिकेट आणि दुलीप करंडकात पृथ्वीने केलेली कामगिरी पाहून १९ वर्षाखालील विश्वचषकासाठी संघाचं नेतृत्व पृथ्वीला देण्यात आलं. यानंतर मोहम्मद कैफ, विराट कोहली आणि उन्मुक्त चंद यांच्यानंतर भारताला विश्वचषक मिळवून देणारा पृथ्वी भारताचा चौथा कर्णधार ठरला आहे.

अवश्य वाचा – द्रविडगिरीला सलाम!

भारतीय सिनिअर संघाच्या निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनीही पृथ्वीच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. “निवड समिती पृथ्वी आणि त्याच्या संघातील इतर सदस्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहे. सिनिअर संघाकडून आणि भारत अ संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला योग्य वेळी संघात जागा मिळेलं”, असंही प्रसाद यांनी म्हटलं आहे. सध्या पृथ्वी शॉ विजय हजारे चषकात मुंबईकडून खेळतो आहे.