भारतीय संघाने २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली, पण उपांत्य फेरीत मात्र भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. साखळी फेरीत भारताने दमदार कामगिरी करून दाखवली. विजेतेपदाचे दावेदार मानले जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला भारताने धूळ चारून आज एक वर्ष झालं. या सामन्यात प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशी एक गोष्ट कर्णधार विराट कोहलीने केली. विश्वचषक स्पर्धेतील त्याच्या या कृत्याबद्दल ICC कडून कोहलीचा विशेष गौरवदेखील करण्यात आला.

काय घडलं होतं प्रकरण

वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने दिमाखदार विजय मिळवला. त्यात कर्णधार विराट कोहलीच्या एका कृतीने सर्वांचीच मनं जिकली. सामना सुरु असताना भारतीय प्रेक्षकांनी स्टीव्ह स्मिथची हुर्यो उडवली. हा प्रकार कर्णधार विराट कोहलीला आवडला नाही. त्याने थेट प्रेक्षकांना खडसावले. इतकंच नव्हे तर त्याने स्मिथसाठी टाळ्या वाजवा असं प्रेक्षकांना सांगितले आणि या प्रकारासाठी प्रेक्षकांच्या वतीने स्मिथची माफीदेखील मागितली. या कृत्यासाठी कोहलीला 2019 ICC Spirit of Cricket पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पाहा ‘तो’ व्हिडीओ

दरम्यान, सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेतही कोहलीला याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर कोहली म्हणाला होता की जे घडलंय त्याला (बॉल टॅम्परिंग प्रकरण) खूप कालावधी झाला आहे. आता स्मिथ मैदानात परतला आहे. एखाद्याचे असे खच्चीकरण करणे योग्य नाही. एखाद्या खेळाडूला मैदानात उतरल्यावर वारंवार अशा घटनांचा सामना करावा लागणं चुकीचेच आहे.

“मैदानात भारतीय प्रेक्षकांची संख्या जास्त होती. सामन्यात स्मिथने काहीच चुकीचे केले नव्हते, ज्यासाठी त्याची हुर्यो उडवली पाहिजे. भारतीय प्रेक्षक त्याची हुर्यो उडवत होते, हे पाहून मलाच वाईट वाटले. समजा माझ्या हातून स्मिथसारखी चूक झाली असती आणि ती मान्य करुन मैदानात परतलो असतो आणि तरी देखील माझी हुर्यो उडवली असती तर मला देखील ते आवडले नसते. म्हणूनच मी प्रेक्षकांच्या वतीने स्मिथची माफी मागितली”, असे कोहलीने सांगितले होते.