जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारतीय संघाला नमवत मालिका जिंकणे अभिमानास्पद असल्याचे दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार ए बी डी’व्हिलियर्सने म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजला मायदेशात चीतपट करणाऱ्या भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दोन्ही लढतीत धुव्वा उडवला.  या विजयाबाबत बोलताना ए बी पुढे म्हणाला, ‘‘शेवटच्या दहापैकी सात एकदिवसीय सामन्यांत आम्ही विजय मिळवला आहे, याचा अर्थ आम्ही योग्य मार्गावर आहोत. सातत्याच्या मुद्यावर आम्ही कमी पडतो. गेल्या दोन वर्षांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये आम्ही संघर्ष करत आहोत. आता ठराविक खेळाडूंना घेऊन आम्ही खेळत आहोत. आम्ही आमच्या खेळाचा आनंद घेत आहोत. एक चांगला संघ बांधण्याची तयारी सुरू आहे.’’