संदीपच्या भेदक माऱ्यापुढे अवघ्या ६५ धावांत खुर्दा

बडोदा : संदीप शर्माच्या भेदक गोलंदाजीमुळे बुधवारी विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत पंजाबने महाराष्ट्राला सहा गडी आणि १३६ चेंडू राखून धूळ चारली. महाराष्ट्राचा हा या स्पर्धेतील तिसरा पराभव ठरला.

प्रथम फलंदाजी करताना संदीपने चार, तर मयांक मरकडे आणि करण कालियाने प्रत्येकी दोन बळी पटकावून महाराष्ट्राला २७.२ षटकांत ६५ धावांत गुंडाळले. नौशाद शेख (२२) आणि ऋतुराज गायकवाड (१४) यांना वगळता महाराष्ट्राचा एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. कर्णधार केदार जाधव (०) आणि राहुल त्रिपाठी (९) यांनी सपशेल निराशा केली.

प्रत्युत्तरात सत्यजित बच्छावने २४ धावांत तीन बळी मिळवून सामन्यात चुरस निर्माण केली. परंतु कर्णधार मनदीप सिंग (२२) आणि सनवीर सिंग (नाबाद ३५) यांच्या संयमी फलंदाजीमुळे पंजाबने चार फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र : २७.२ षटकांत सर्व बाद ६५ (नौशाद शेख २२, ऋतुराज गायकवाड १४; संदीप शर्मा ४/२४) पराभूत वि. पंजाब : २७ षटकांत ४ बाद ६६ (सनवीर सिंग ३५*, मनदीप सिंग २२; सत्यजित बच्छााव ३/२४).

यशस्वीच्या द्विशतकामुळे मुंबई विजयी

बेंगळूरु : मुंबईचा उदयोन्मुख किशोरवयीन क्रिकेटपटू यशस्वी जैस्वालने (२०३) बुधवारी विजय हजारे क्रिकेट स्पर्धेत द्विशतकी नजराणा पेश केला. त्याने साकारलेल्या धडाकेबाज खेळीला धवल कुलकर्णीच्या पाच बळींची साथ लाभल्यामुळे मुंबईने झारखंडवर ३९ धावांनी विजय मिळवला.