भारतात सध्या करोना विषाणूने थैमान घातलं आहे. या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक सरकारी यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत…तरीही प्रत्येक दिवशी महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत. समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोकं आता करोनाविरोधात एकत्र येत आहेत. बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूनेही आपली सामाजिक जबाबदारी ओळखत…तेलंगणा आणि आंध्र प्रदेश सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीला ५ लाखांची मदत दिली आहे. सिंधूने आपल्या ट्विटर अकाऊंटवर याची घोषणा केली.

याआधी बजरंग पुनिया, गौतम गंभीर या खेळाडूंनीही आपला पगार करोनाविरुद्ध लढ्यात सहायता निधीसाठी दिला आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही आपली जबाबदारी ओळखत गरजू व्यक्तींना तांदूळ वाटप करायचं ठरवलं आहे. भारतात करोना बाधित रुग्णांचा आकडा ६०० च्या वर गेला असून आतापर्यंत १३ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी १४ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण देश लॉक डाऊन करण्याची घोषणा केली.

भारतासह जगभरात करोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. अनेक महत्वाच्या क्रीडा स्पर्धा करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. यंदा टोकियो शहरात होणारं ऑलिम्पिकही २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आलंय. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धाही बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.

अवश्य वाचा – करोनाशी लढा : संकटकाळातही मुंबईकरांची माणुसकी कायम !