इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या पर्वाच्या आयोजनासाठी मुंबई सज्ज झाले असतानाच करोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे आता आर्थिक राजधानीतील सामन्यांच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरात करोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहेत. तेथील काही भागांमध्ये करोनाचे नियम कडक करण्यात आले आहेत. अशातच ‘आयपीएल’चे वेळापत्रक रविवारी सादर केले जाणार असून त्यात मुंबईला स्थान न देण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) दबाव वाढू लागला आहे.

मुंबईत यंदाच्या मोसमातील १० सामने आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. पण करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मुंबईला लाल कंदील दाखवण्यात येण्याची शक्यता आहे. ‘आयपीएल’चे आयोजन सहा शहरांमध्ये केले जाणार असल्याचे ‘बीसीसीआय’ने जाहीर केले होते. पण कोलकाता, बेंगळूरु, अहमदाबाद, चेन्नई आणि दिल्ली या अन्य शहरांपेक्षा मुंबईतील करोनाबाबतची परिस्थिती अधिकच बिघडली आहे. मुंबई आणि महानगरांमध्ये दिवसेंदिवस करोनारुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. ठाणे आणि नाशिक या शहरांमधील काही भागांमध्ये टाळेबंदी करण्यात आली आहे.

‘आयपीएल’च्या यंदाच्या मोसमाला प्रारंभ होण्यापूर्वी परिस्थिती सुधारलेली असेल, अशी आशा ‘आयपीएल’ प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी व्यक्त केली. ‘‘परिस्थिती हाताबाहेर गेल्यास, अन्य पर्यायांची चाचपणी आम्ही आधीच केली आहे,’’ असे पटेल यांनी सांगितले. त्यामुळे प्रशासकीय समितीच्या पुढील बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचे सुरुवातीचे सामने मुंबईत होणार आहेत. त्यामुळे मुंबईतील स्टेडियमजवळ सराव करण्याचे या दोन्ही संघांनी ठरवले आहे.