मैदानावरील भांडण प्रकरण
वेस्टइंडिजमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेदरम्यान यजमान विंडिजविरुद्धच्या सामन्यात झेल सुटल्यावरून झालेल्या बाचाबाची प्रकरणी रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना या दोघांनी घडलेल्या प्रकरणाबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे. बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जडेजा आणि रैनाने संघाचे व्यवस्थापक एम.व्ही.श्रीधर यांची भेट घेतली. झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. तसेच यापुढे अशी घटना पुन्हा होणार नाही याची ग्वाही दिली. दोघांनाही आपण एका देशाचे राष्ट्रीय खेळाडू असून अशी चूक करणे योग्य नाही याची जाणीव झाली असल्याचेही बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले आहे.
त्यामुळे या दोघांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचे समजते. तसेच दोघांनी माफी मागितल्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दंडही आकारण्यात येणार नाही. झालेल्या घटनेचा फक्त लेखी अहवाल देण्यास बीसीसीआयने सांगितले आहे.