गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या बाद फेरीत पोहोचण्याच्या आशा केव्हाच मावळल्या आहेत, परंतु राजस्थान रॉयल्सला हरवून गुणतालिकेचे समीकरण मात्र ते बिघडवू शकतात. आयपीएलच्या अंतिम चार संघांमध्ये पोहोचण्यासाठी राजस्थानचा संघ अतिशय आशावादी असल्यामुळे मुंबईविरुद्धचा विजयही त्यांच्यासाठी महत्त्वाचा असेल.
मागील वर्षी आयपीएल व चॅम्पियन्स लीग विजेत्या मुंबईचा संघ सध्या आयपीएल गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंतच्या १० सामन्यांपैकी फक्त तीन सामने त्यांना जिंकता आले आहेत. त्या तुलनेत राजस्थान रॉयल्सची घोडदौड अधिक आत्मविश्वासाने होत आहे. ११ सामन्यांपैकी ७ सामने जिंकून १४ गुणांसह हा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. पहिल्यावहिल्या आयपीएल जेतेपदाला गवसणी घालणारा हा संघ यंदा त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक आहे. शेनवॉटसन, स्टीव्हन स्मिथ, करुण नायर व अजिंक्य रहाणे हे राजस्थानच्या यशाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत.
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात राजस्थानने हार पत्करली होती. त्या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या मर्यादा काही प्रमाणात समोर आल्या होत्या. कर्णधार चे अर्धशतक वगळता कोणत्या आघाडीच्या फलंदाजाला मैदानावर टिकाव धरता आला नव्हता. परंतु या आधीच्या सामन्यात राजस्थानने दुबळ्या दिल्लीला आरामात हरवले होते.
मुंबई इंडियन्समधील लेंडल सिमॉन्स आणि अंबाती रायुडू चांगले फॉर्मात आहेत. परंतु कर्णधार रोहित शर्माला यंदाच्या आयपीएलमध्ये आपले सातत्य टिकवता आले नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ अपयशी ठरत आहे. त्यामुळे मुंबईचा अधिक भरवसा गोलंदाजांवर आहेत. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा त्यांच्याकडे आहे. त्याच्या खात्यावर आता १६ बळी जमा आहेत.