राजस्थान रॉयल्सचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसने आयपीएल २०२१ स्पर्धा पुढे ढकलल्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मॉरिसने बीसीसीआयच्या या निर्णयाचे समर्थन केले असून यावेळी प्रत्येकाने करोनाला पूर्णपणे पराभूत करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मॉरिसने सांगितले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

राजस्थान रॉयल्सच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये टीमच्या खेळाडूंनी आयपीएल पुढे ढकलल्यानंतर प्रतिक्रिया दिली. ख्रिस मॉरिसच्या म्हणण्यानुसार, आयपीएल पुढे ढकलणे निराशाजनक आहे, परंतु करोनापासून लोकांना वाचवणे हे प्रथम प्राधान्य असले पाहिजे.

 

ख्रिस मॉरिसचे विधान

मॉरिस म्हणाला, “आयपीएल थांबवणे निराशाजनक आहे, पण ती गोष्ट घडली आहे. याक्षणी अनेक लोक समस्यांशी झगडत आहेत आणि बहुधा हा योग्य निर्णय आहे. करोनाचा पराभव केला पाहिजे कारण या क्षणी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ”

…आयपीएल पुन्हा सुरू करता येईल.

मॉरिस म्हणाला, “चांगली गोष्ट म्हणजे आपण उर्वरित स्पर्धा नंतर करू. त्यामुळे आत्ताचा हा निर्णय योग्य आहे. शक्यतो घरी राहा. एकदा करोना गेला तर आपण पुन्हा आयपीएलमध्ये खेळू.” मॉरिस हा यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात महागडा खेळाडू होता. त्याला १६.२५ कोटींची बोली लावत राजस्थानने संघात दाखल केले होते.

करोना विषाणूमुळे आयपीएलचा १४वा हंगाम पुढे ढकलण्यात आला. अनेक खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन थांबवण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक फलंदाज वृध्दिमान साहा करोना पॉझिटिव्ह आढळले आणि त्यानंतर आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.