गुवाहाटी : मध्यमगती गोलंदाज आशय पालकर आणि मुकेश चौधरी यांच्या भेदक माऱ्यासमोर आसामचा दुसरा डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आणत महाराष्ट्राने २१८ धावांनी विजयाची नोंद केली. दुसऱ्या विजयासह महाराष्ट्राने रणजी करंडक स्पर्धेच्या एलिट क गटात १५ गुणांची कमाई केली आहे.

आसामने पहिल्या डावात ६९ धावांची आघाडी घेतली होती. पण महाराष्ट्राने जय पांडेच्या शतकी खेळीमुळे आसामसमोर २९७ धावांचे उद्दिष्ट ठेवले होते. सामना रंगतदार स्थितीत असताना महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी चौथ्या दिवशी कमाल केली. मुकेश आणि आशय यांनी आसामच्या एकाही फलंदाजाला मैदानावर ठाण मांडण्याची संधी दिली नाही. या दोघांच्या प्रभावी माऱ्यासमोर आसामचा दुसरा डाव अवघ्या २९.५ षटकांत ७८ धावांवर गडगडला. साहिल जैन (१९), शुभम मंडल (१७) आणि रिषव दास (१५) यांचा अपवाद वगळता महाराष्ट्राच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. आशय पालकरने ४२ धावांमध्ये ६ बळी टिपले. मुकेशने तीन बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली. मात्र दुसऱ्या डावातील शतकवीर जय पांडे सामनावीराचा मानकरी ठरला.

संक्षिप्त धावफलक

’ महाराष्ट्र (पहिला डाव) : १७५

’ आसाम (पहिला डाव) : २४४

’ महाराष्ट्र (दुसरा डाव) : ९ बाद ३६५

’ आसाम (दुसरा डाव) : २९.५ षटकांत सर्व बाद ७८ (साहिल जैन १९, शुभम मंडल १७; आशय पालकर ६/४२, मुकेश चौधरी ३/३०).

’ सामनावीर : जय पांडे (महाराष्ट्र)