मुंबईचा संघ फिरकी गोलंदाजीला सहजपणे खेळतो, असे म्हटले जात असले, तरी तामिळनाडूचा डावखुरा फिरकीपटू राहिल शाहपुढे मात्र त्यांची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली. राहिलच्या भेदक माऱ्याच्या जोरावर तामिळनाडूने मुंबईचा १४१ धावांमध्ये खुर्दा उडवला. मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना तामिळनाडूने पहिल्या दिवसअखेर ४ बाद १३६ अशी दमदार मजल मारली असून, ते फक्त सहा धावांनी पिछाडीवर आहेत.
नाणेफेक जिंकत मुंबईने फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला, पण फलंदाजांनी मात्र साफ निराशा केली. राहिलने पहिल्याच स्पेलमध्ये दोन फलंदाजांना बाद केले. मुंबईच्या सहा फलंदाजांना यावेळी दोन अंकी धावसंख्याही उभारता आली नाही. ऑफ-स्पिनर सुरेश कुमारने दोन, तर मालोलन रंगराजनने एक बळी मिळवला. मुंबईकडून श्रेयस अय्यर वगळता एकाही फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर उभे राहता आले नाही. श्रेयसने ५० धावांची खेळी साकारली. अनुभवी सलामीवीर वसिम जाफरला यावेळी भोपळाही फोडता आला नाही.
तामिळनाडूच्या दिनेश कार्तिक (४३) आणि विजय शंकर (४७) यांनी दमदार फलंदाजी करत संघाला शतकाची वेस ओलांडून दिली. मुंबईकडून अखिल हेरवाडकरने भेदक मारा करत पाच धावांमध्ये दोन फलंदाजांना माघारी धाडले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ४८.५ षटकांमध्ये सर्व बाद १४१ (श्रेयस अय्यर ५०; राहिल शाह ७/३४)
तामिळनाडू (पहिला डाव) : ४३ षटकांत ४ बाद १३६ (विजय शंकर ४७, दिनेश कार्तिक ४३; अखिल हेरवाडकर २/५).
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2015 6:01 am