रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेतील महाराष्ट्राविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज झहीर खान खेळणार असल्यामुळे मुंबईचा संघ मजबूत झाला आहे. याचप्रमाणे दुखापतीतून सावरलेला अभिषेक नायर मुंबईच्या संघात परतला आहे.
मुंबईला साखळी फेरीतील ‘अ’ गटामधील अखेरच्या सामन्यात गुजरातविरुद्ध अखेरच्या दिवसापर्यंत झगडावे लागले होते.
वानखेडे स्टेडियमवर ८ ते १२ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या सामन्यासाठी मुंबईने गुजरातवर आश्चर्यकारक विजय मिळवणाऱ्या आपल्या संघात पाच बदल केले आहेत. हिकेन शाह, सिद्धेश लाड, दोरायस्वामी सुब्रमण्यम, बलविंदरसिंग संधू (ज्यु.) आणि प्रवीण तांबे यांना महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यासाठी वगळण्यात आले आहे. तर झहीर, नायर, विनीत इंदुलकर, निखिल पाटील (ज्यु.) आणि सर्वेश दामले यांचा मुंबईच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
मुंबई संघ : झहीर खान (कर्णधार), वसिम जाफर, अभिषेक नायर, आदित्य तरे, कौस्तुभ पवार, सूर्यकुमार यादव, विशाल दाभोळकर, जावेद खान, शार्दुल ठाकूर, इक्बाल अब्दुल्ला, सागर केरकर, विनीत इंदुलकर, निखिल पाटील (ज्यु.), सर्वेश दामले आणि सौरभ नेत्रावळकर. प्रशिक्षक : सुलक्षण कुलकर्णी