भारताचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी इंग्लंड दौऱ्यावर जाताना बऱ्याच गोष्टी केल्या होत्या, पण त्यांना आपला शब्द मात्र खरा करता आला नव्हता. या दौऱ्यात पराभव झाल्यानंतर मात्र काही माजी कर्णधारांनी शास्त्री यांच्यावर टीका केली होती. आता तर बीसीसीआयनेही शास्त्री यांना चांगलेच फटकारले आहे. फुकटची बडबड करण्यापेक्षा तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करा, असे बीसीसीआयमधील प्रशासकीय समितीने शास्त्री यांनी सुनावले आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी शास्त्री यांनी सांगितले होते की, हा संघ गेल्या पंधरा वर्षांमधील सर्वोत्तम असेल, पण या दौऱ्यात भारताला एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि सौरव गांगुली यांनी शास्त्री यांच्या विधानावर जोरदार टीका केली होती. बीसीसीआयच्या प्रशासीय समितीने शास्त्री यांना सांगितले की, तुम्ही जे काही विधान कराल ते पूर्ण जबाबदारीने करायला हवे. यापूर्वी तुम्ही जे काही म्हटले आहे ते योग्य नाही. तुम्ही बोलण्यापेक्षा कामावर अधिक लक्ष द्यायला हवे. आता ऑस्ट्रेलियाचा दौरा होणार आहे. या दौऱ्यात भारताची कामगिरी कशी चांगली होईल, याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवे.