कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी फेरनियुक्ती केली. यानंतर संजय बांगर यांचा अपवाद वगळता गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदावरही भारत अरुण आणि आर.श्रीधर यांना पसंती देण्यात आली. एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने विक्रम राठोड यांच्याकडे फलंदाजी प्रशिक्षकपदाची सुत्र सोपवली. या फेरनियुक्तीनंतर रवी शास्त्री यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, बीसीसीआयमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी शास्त्री यांच्या वार्षिक मानधनात तब्बल २० टक्क्यांनी वाढ होणार आहे. नवीन करारानुसार रवी शास्त्री यांना १० कोटी वार्षिक मानधन देण्यात येणार आहे. मुंबई मिरर वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

रवी शास्त्री यांच्यासोबत भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांच्या पगारातही आश्वासक वाढ होणार आहे. भारत अरुण यांना वार्षिक ३ कोटी ५० लाख रुपयांचं मानधन मिळण्याची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर.श्रीधर यांनाही भारत अरुण यांच्याइतकच मानधन मिळू शकतं. भारतीय संघात नव्याने दाखल झालेल्या फलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांना अडीच ते तीन कोटींच्या घरात वार्षिक मानधन मिळण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा – मुंबईचा अमोल मुझुमदार दक्षिण आफ्रिकेचा हंगामी फलंदाजी प्रशिक्षक

२०१९ विश्वचषकापर्यंत रवी शास्त्री यांचा बीसीसीआयसोबत करार झाला होता. यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शास्त्री आणि त्यांच्या सहायकांना मुदतवाढ देण्यात आली. यानंतर बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवले होते. यामध्ये अपेक्षेप्रमाणे रवी शास्त्री यांची नेमणूक करण्यात आली. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघासमोर घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. १५ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ कसोटी सामने खेळणार आहे.