भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाला यंदाचा मानाचा अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. १२ सदस्यांच्या समितीने रविंद्र जाडेजासह १९ खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. बायुचंग भूतिया, मेरी कोम यासारख्या दिग्गज खेळाडूंचा या समितीमध्ये समावेश होता. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत रविंद्र जाडेजाने आश्वासक कामगिरी केली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात जाडेजाने ५९ चेंडूत ७७ धावा केल्या होत्या, मात्र दुर्दैवाने या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. रविंद्र जाडेजाने आतापर्यंत ४१ कसोटी, १५६ एकदिवसीय आणि ४२ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. रविंद्र जाडेजासोबत गोळाफेकपटू तेजिंदरपाल सिंह तूर, धावपटू मोहम्मद अनस, स्वप्ना बर्मन, फुटबॉलपटू गुरप्रितसिंह संधू, हॉकीपटू चिंगलेन साना आणि महिला नेमबाज अंजुम मुद्गीलचीही या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.