संपूर्ण देश करोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेशी झुंज देत आहे. प्रत्येकजण आपापल्या स्तरावर मदत करत आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्माही मदतीसाठी पुढे आले. या जोडीने करोना पीडितांच्या मदतीसाठी ११ कोटी रुपयांचा निधी जमा केला. आता विराट नेतृत्व करत असेलेल्या आयपीएल स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या मालक कंपनीने तब्बल ४५ कोटी देण्याचे वचन दिले आहे. हा निधी करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी वापरला जाईल.

हेही वाचा – PSLमधून बाहेर पडला शाहिद आफ्रिदी, दुसऱ्या आफ्रिदीनं घेतली जागा

आरसीबीची मालक कंपनी डिएगोने प्रत्येक राज्यातील एका जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्याची पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ४५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर दीर्घकालीन ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी २१ शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

 

आरसीबीच्या मालकाने आणखी १५ शहरांमध्ये १६ खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद कृपालू म्हणाले, की या संकटादरम्यान कंपनीला देशातील लोकांसमवेत उभे राहायचे आहे. कंपनीचे मुख्य लक्ष्य सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हॉस्पिटलचे बेड आणि ऑक्सिजन केंद्रे प्रदान करणे हे आहे.

हेही वाचा – पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आपल्या ‘प्रमुख’ गोलंदाजाला काढलं PSL स्पर्धेबाहेर, वाचा कारण

बीसीसीआयचाही पुढाकार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळही (बीसीसीआय) करोनाग्रस्त लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. बीसीसीआयने १० लीटरचे २००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्याची घोषणा केली आहे. येत्या काही महिन्यांत हे कॉन्सन्ट्रेटर देशभरातील गरजू लोकांना देण्यात येतील.
बीसीसीआयपूर्वी विराट कोहली, ऋषभ पंत, हनुमा विहारी, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, शिखर धवन यांच्यासह अनेक भारतीय खेळाडूंनी करोनाविरुद्धच्या लढ्यात मदत केली आहे. भारतात दररोज २ लाखाहून अधिक करोनाची प्रकरणे समोर येत आहेत.