|| धनंजय रिसोडकर

भारतातील बहुतांश संस्थांकडे जेव्हा साध्या रेंज होत्या, त्या दीड दशकापूर्वीच्या काळातही जागतिक दर्जाच्या संगणकीय प्रणालीशी जोडलेली ‘सुइस्कॉर’ रेंजपासून स्वातंत्र्यवीर सावरकर एअर रायफल क्लबचा प्रारंभ झाला आहे. त्यामुळेच या कालावधीत संस्थेने ४०हून अधिक राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते आणि १३ आंतरराष्ट्रीय नेमबाज घडवण्याची कामगिरी करून दाखवली आहे. तसेच तिथेच चालणाऱ्या तिरंदाजी अकादमीतूनदेखील राष्ट्रीय स्तरावरील ५७ पदकविजेते खेळाडू गेल्या दहा वर्षांत निर्माण झाले आहेत.

कोणत्याही संस्थेच्या किंवा एखाद्या नावीन्यपूर्ण उपक्रमामागची प्रेरणा ही त्याच्या भवितव्याची दिशा निश्चित करीत असते. त्यामुळेच ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाला शस्त्रसज्ज व्हा, हा मंत्र दिला त्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाने उभ्या असलेल्या राष्ट्रीय स्मारकात नेमबाजीचे प्रशिक्षण म्हणजे त्यांच्याच मार्गदर्शक तत्त्वांवर चालण्याचाच भाग असतो. दादरमधील स्वातंत्र्यवीरांच्या स्मारकात चालवल्या जाणाऱ्या या नेमबाजीच्या अग्निहोत्राचे नाते तेव्हापासूनच अत्याधुनिकतेशी आणि सर्वोच्च गुणवत्तेशी जोडले गेले आहे. २००६ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात या नेमबाजी क्लबचा प्रारंभ करण्यात आला. शूटिंग रेंज म्हटले की किमान दोन-तीन एकर जागा आणि त्यावर उभारलेली साधनसामग्री असेच चित्र कुणाच्या नजरेपुढे येते. मात्र सावरकर राष्ट्रीय स्मारकातील तिसऱ्या मजल्यावर उपलब्ध असलेल्या अत्यल्प जागेतील या रेंजच्या उभारणीपासून त्यातील प्रत्येक बाबीत जागेचा कमाल उपयोग करून दाखवण्याची किमया साधण्यात आली आहे. त्यातही आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दर्जाचे ‘ब’ प्रमाणपत्रप्राप्त विश्वजीत शिंदे (भारतात अवघ्या चौघांकडेच हा दर्जा) यांच्यासारखे अव्वल प्रशिक्षक ही या केंद्राची सर्वाधिक जमेची बाजू ठरते. साधनसुविधा आणि प्रशिक्षकही अत्याधुनिक असल्याने त्यातून निर्माण झालेल्या नेमबाजांमधून राष्ट्रीय स्तरावर झळकणारे २५० खेळाडू संस्थेने घडवले नसते, तरच नवल होते.

गोळीपासून रायफलपर्यंतचे इत्थंभूत ज्ञान

या केंद्रात येणाऱ्या प्रत्येकाला सर्वप्रथम वेगवेगळ्या रायफल्सच्या वेगवेगळ्या गोळ्या, त्यांचे प्रकार, त्या पिस्तूलच्या-रायफलच्या रेंजची माहिती, त्यांच्या कार्यपद्धती, तसेच अंतर्गत यंत्रणा या सर्व बाबींची इत्थंभूत माहिती करून दिल्यानंतर मगच त्यांना पुढील प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला जातो. तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाज, क्रीडा मानसतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट तसेच अन्य मार्गदर्शकांच्या विशेष सत्रांचे आयोजन केले जाते.

शासकीय रेंजवर जी दर आकारणी असते, त्यापेक्षा निम्म्या दरात आंतरराष्ट्रीय स्तराच्या सुविधायुक्त वातानुकूलित रेंज म्हणजे सामान्य घरांतील नेमबाजांपर्यंत शस्त्र प्रशिक्षण पोहोचवण्याचा घेतलेला वसाच आहे. तो एका ध्यासाने आम्ही स्वीकारला असून त्यातूनच एकाहून एक सरस नेमबाज घडत आहेत. सावरकरांच्या प्रेरणेतून उभारलेले हे प्रशिक्षण केंद्र अव्वल दर्जाचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नेमबाज घडवण्याचे कार्य अव्याहतपणे सुरूच ठेवणार आहे.    – विश्वजीत शिंदे, नेमबाज आणि प्रशिक्षक 

तिरंदाजीतील नैपुण्य

तिरंदाजीच्या अकादमीचा प्रारंभ २००९ मध्ये झाला. त्या वेळीदेखील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तराचे तिरंदाज निर्माण करण्याचा ध्यास त्यामागे होता. सध्या या अकादमीत ४५ मुले आणि ३० मुली असे ७५ खेळाडू स्वप्निल परब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. गेल्या १० वर्षांत १५०० हून अधिक तिरंदाजांनी या संस्थेतून प्रशिक्षण घेतले आहे. या अकादमीत तिरंदाजीसाठी २०, ३० आणि ५० मीटपर्यंतच्या लक्ष्यसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यापेक्षा अधिक अंतराच्या सरावासाठी मग संबंधित तिरंदाजांना वरळी स्पोर्ट्स क्लब किंवा कामगार क्रीडा भवनला नेऊन प्रशिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे केवळ व्यावसायिक स्तरावर तिरंदाजी करणारेच नव्हे, तर केवळ हौस म्हणून तिरंदाजी शिकणाऱ्यांचे प्रमाणदेखील लक्षणीय आहे. तिरंदाजीचा उपयोग अशा व्यक्तींना तणावमुक्ती तसेच एकाग्रता वृद्धीसाठी चांगल्या प्रकारे होतो. प्रशिक्षणासाठी येणाऱ्या प्रत्येकाला सर्वप्रथम एकाग्रता आणि बौद्धिक स्तरावरील प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे तिरंदाजी प्रशिक्षणासाठी आलेल्या प्रत्येक खेळाडूच्या बौद्धिक आणि मानसिक तयारीत मोठा सकारात्मक बदल घडून येतो.

विशेष मार्गदर्शन सत्र

या रेंजवर येणाऱ्या तिरंदाजांना एका विशिष्ट स्तरानंतर पुढचा स्तर गाठण्यासाठी कशा प्रकारे प्रयास करायला हवे, त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले जाते. त्याचा फायदा तिरंदाजांना त्यांचा स्तर उंचावण्यास होत असल्यामुळेच गत दशकापासून मुंबईसह राज्यस्तरीय स्पर्धामध्ये सावरकर अकादमीच्या तिरंदाजांचा दबदबा दिसून येतो.