भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात ३ गडी राखून विजय मिळवला. ४ सामन्यांच्या मालिकेत २-१ ने मालिका जिंकत भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकून स्वत:कडेच ठेवण्यात यश मिळवलं. यात विविध खेळाडूंचं योगदान दिसून आलं. पण या यशाचा कळस चढवला तो ऋषभ पंत याने… बेजबाबदार फटके खेळणारा ऋषभ पंत अशी अवहेलना होणाऱ्या ऋषभ पंतने आज भारतीय संघाला विजयश्री मिळवून दिली आणि मुख्य म्हणजे नाबाद राहून विजयी फटका खेळण्याचा बहुमान मिळवला.

Video: पंतचा पुन्हा ‘तो’ फटका; नॅथन लायनही झाला अवाक

ऋषभ पंतने दमदार खेळी केली. त्याने १३८ चेंडूत ९ चौकार आणि एक षटकार लगावत नाबाद ८९ धावा केल्या. ऋषऊ पंत हा अतिशय दमदार खेळ करणारा खेळाडू असला तरी त्याच्याकडे संयम नाही अशी टीका अनेकदा केली जात होती. पण आजच्या सामन्यात तो नाबाद राहिला आणि संघाला विजय मिळवून देईपर्यंत खेळपट्टीवर तग धरून राहिला. त्याच्या या खेळीमुळे त्याने ‘करून दाखवलं’ आणि टीकाकारांची तोंडं बंद केली.

Videos: चेतेश्वर पुजारा The Wall- कांगारुंच्या शरीरभेदी माऱ्याला पुरून उरणारा भारतीय!

ऋषभ पंतने या सामन्यात एक विक्रम केला. सर्वात कमी वेळेत ५० किंवा त्यापेक्षा जास्त बळी मिळवण्यात हातभार लावण्याचा भारतीय यष्टीरक्षकाचा विक्रम त्याच्या नावे होताच. त्याने ११ कसोटी आणि २२ डावांमध्ये हा पराक्रम केला होता. त्यानंतर आज त्याने आणखी एक विक्रम केला. सर्वात जलद एक हजार धावांचा टप्पा गाठणारा भारतीय यष्टीरक्षक ठरण्याचा बहुमान त्याने मिळवला. त्याने १६ कसोटी आणि २७ डावांमध्ये हि किमया साधली.