Ind vs Eng : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने २०३ धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारत मालिकेत २-१ असा पिछाडीवर आहे. परंतु या सामन्यात अनेक अनुभवी खेळाडूंना सूर गवसल्यामुळे हा सामना भारतासाठी महत्वाचा ठरला. याच सामन्यात अनुभवी खेळाडूंव्यतिरिक्त एका नवोदित खेळाडूने आपली छाप पाडली. ऋषभ पंत याने पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच डावात ५ झेल टिपले आणि आपली उपयुक्तता सिद्ध केली. तसेच पहिल्या डावात इतर काही फलंदाज अयशस्वी झाले असताना त्याने झुंजार २४ धावांची खेळी केली.

पदार्पणाच्या सामन्यात षटकार खेचून त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय धावांचा रतीब घालण्यास सुरुवात केली. त्याच्या त्या षटकाराने तो किती सहजपणे खेळ करू शकतो ते त्याने दाखवून दिले. कसोटीसारख्या मोठ्या आणि दडपणाच्या खेळात पदार्पण करणे त्याच्यासाठी इतके सोपे कसे गेले, याबाबत ऋषभ पंत याने उत्तर दिले.

इंग्लंडमध्ये यष्टिरक्षण करणे हे नेहमीच आव्हानात्मक आणि कठीण असते, कारण यष्ट्यांच्या मागे चेंडू मोठ्या प्रमाणावर स्विंग होतो. पण मी इंग्लंड दौऱ्यावर गेले अडीच महिने ‘भारत अ’ संघाकडून क्रिकेट खेळत संधी मिळाली होती. त्यामुळे माझ्यासाठी कसोटी पदार्पण सोपे ठरले, असे ऋषभने सांगितले.