२००७ साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत पहिला टी-२० विश्वचषक जिंकला होता. या संघात रॉबिन उथप्पा या अष्टपैलू खेळाडूने महत्वाची भूमिका बजावली होती. सध्या रॉबिन उथप्पा भारतीय संघाच्या शर्यतीत नसला तरीही त्याने आतापर्यंत ४६ वन-डे आणि १३ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आयपीएलमध्ये मात्र तो सातत्याने खेळत आलेला आहे. एकेकाळी भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू असलेला रॉबिन उथप्पा आपल्या आयुष्यातील काही काळ नैराश्याग्रस्त होता. या काळात आपल्या मनात आत्महत्येचाही विचार येऊन गेल्याचं खुद्द रॉबिनने सांगितलं.

“मला आठवतंय २००९ ते २०११ हा काळा माझ्यासाठी प्रचंड खडतर होता. माझ्या आयुष्यात काय सुरु आहे आणि मी योग्य दिशेने जातोय की नाही हे देखील मला माहिती नव्हतं. आजचा दिवस ढकलायचा आणि उद्याचा दिवस कसा असेल याची वाट पहायची असं मी जगत होतो. क्रिकेटमुळे मला कधीकधी बरं वाटायचं, पण सामने नसताना ज्यावेळी मी घरी असायचे त्यावेळी प्रचंड त्रास व्हायचा. त्यावेळी घरात असताना मला कायम वाटायचं की बाल्कनीत जाऊन जीव द्यावा. पण काही गोष्टींनी मला तसं करण्यापासून थांबवलं. त्याकाळात मी स्वतःची डायरी लिहायला सुरुवात केली, यादरम्यान माणूस म्हणून माझ्यात बराच बदल झाला.” राजस्थान रॉयल्सच्या Mind, Body and Soul या ऑनलाईन कार्यक्रमात उथप्पा आपले विचार मांडत होता.

गेले काही वर्ष उथप्पा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधीत्व करत होता. परंतू तेराव्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्स संघाने उथप्पाला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं. करोना विषाणूचा सामना करण्यासाठी बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम सध्या पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. या लॉकडाउनच्या काळात सर्व खेळाडू घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत.

अवश्य वाचा – आयपीएलचा तेरावा हंगाम भारताबाहेर?? BCCI कडून पर्यायांवर विचार सुरु