वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. लेंडल सिमन्स, एविन लुईस, शेमरॉयन हेटमायर आणि निकोलस पूरन या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवलं. पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात शिवम दुबेचा अपवाद वगळता एकही फलंदाज त्याच्या लौकिकाला साजेशी खेळी करु शकला नाही.

अवश्य वाचा – ….तर कितीही धावा करा, कमीच पडतील – विराट कोहली

विशेषकरुन भारताचा सलामीवीर रोहित शर्माचं गेल्या काही सामन्यांपासून भारतीय मैदानांवरचं अपयश हे संघासाठी चिंताजनक ठरतंय. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय मैदानांवर गेल्या ९ सामन्यांमध्ये एका सामन्याचा अपवाद वगळता रोहित शर्मा पूर्णपणे अपयशी ठरला आहे. बांगलादेशविरुद्ध राजकोट येथे झालेल्या सामन्यात केलेली ८५ धावांची खेळी ही त्याची गेल्या ९ सामन्यांधली सर्वोत्तम खेळी आहे.

विंडीजविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांमध्येही रोहित शर्मा अपयशी ठरला. पहिल्या सामन्यात लोकेश राहुल आणि विराट कोहली तर दुसऱ्या सामन्यात शिवम दुबेने भारतीय संघाची बाजू सावरली. सध्या ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आहेत. ११ तारखेला या मालिकेतला अखेरचा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यामुळे आपल्या घरच्या मैदानावर रोहित आपला धावांचा दुष्काळ संपुष्टात आणतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Video : जाना था जपान, पहुंच गए चीन ! अरेरे…ऋषभ पंतसोबत हे काय झालं??