मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणारा रोहित शर्मा हा आयपीएलमधला यशस्वी कर्णधार मानला जातो. आतापर्यंत रोहितने आपल्या नेतृत्वाखाली मुंबईला आयपीएलमध्ये चार विजेतेपदं मिळवून दिली आहेत. अनेकदा काही माजी खेळाडूंनी टी-२० भारतीय संघाचं नेतृत्व रोहितकडे द्यावं अशी मागणी केली होती. भारताचा माजी फलंदाज व्ही.व्ही.एस.लक्ष्मणनेही रोहितच्या खेळाचं कौतुक करत, आयपीएलमध्ये तो यशस्वी कर्णधार ठरण्यामागचं कारण सांगितलं आहे.

“माझ्यामते डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळत असताना रोहितमध्ये सर्वातप्रथम हे नेतृत्व कौशल्य निर्माण झालं. पहिल्या वर्षी तो संघात आला, तेव्हा तो तुलनेने नवीन होता. तरीही मधल्या फळीत त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती पाहण्यासारखी होती. सुरुवातीच्या हंगामात डेक्कन चार्जर्सची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती, मात्र रोहितने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं होतं. प्रत्येक सामन्यागणित त्याचा आत्मविश्वास वाढत जातो. तो ज्या पद्धतीने आपल्या सहकाऱ्यांना विश्वास देतो, गोलंदाजांना मार्गदर्शन करतो हे पाहण्यासारखं असतं. पण यापेक्षाही महत्वाचं म्हणजे तो खडतर काळात स्वतःवर दबाव येऊ देत नाही. याच कारणामुळे तो आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार आहे.” लक्ष्मण स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होता.

देशातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मध्यंतरी ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक पुढे ढकलत त्या जागी आयपीएल खेळवण्याची चर्चा सुरु होती. मात्र आयसीसीने यासंदर्भातली आपली बैठक १० जूनपर्यंत पुढे ढकलली असल्यामुळे अद्याप टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल निर्णय घेण्यात आलेला नाहीये. मात्र यंदाची आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार आहे, त्यामुळे बीसीसीआय वर्षाअखेरीस ही स्पर्धा खेळवता येते का याची चाचपणी करत आहे.