रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं विजेतेपद पटकावून पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. कर्णधार म्हणून रोहितचं हे पाचवं तर खेळाडू म्हणून सहावं विजेतेपद ठरलं. मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर विराट कोहलीने टी-२० संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार होत रोहितकडे नेतृत्व सोपवण्याच्या मागणीला जोर धरु लागला आहे. अनेक माजी खेळाडूंनी केलेल्या मागणीला इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैननेही सहमती दर्शवली आहे.

“रोहितची कर्णधारपदाची शैली, मैदानात त्याचं डोकं शांत ठेवून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं. मुंबई इंडियन्सकडून खेळत असताना रोहित चांगल्या फॉर्मात असतो हे त्याने सिद्ध केलंय. कदाचीत आता विराटने टी-२० चं कर्णधारपद सोडण्याची वेळ आलेली आहे. रोहितने आता भारतीय संघाचं नेतृत्व करावं. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये केलेला विक्रमच याची साक्ष देतात.” Sky Sports ला दिलेल्या मुलाखतीत हुसैन बोलत होता.

अवश्य वाचा – इशान किशन आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार, घेऊ शकतो संघात धोनीची जागा – एम. एस. के. प्रसाद

मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित सध्याच्या घडीचा सर्वोत्तम खेळाडू आहे. वन-डे क्रिकेटमध्येही त्याच्या नावावर द्विशतकांची नोंद आहे. अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवसोबत झालेल्या गोंधळानंतरही त्याने ज्या पद्धतीने स्पष्टीकरण दिलं ते पाहता रोहित प्रलग्भ कर्णधार आहे याची जाणीव होते असंही हुसैन म्हणाला. सध्या रोहित आपल्या परिवारासोबत भारतात परतला असून पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान तो भारतीय संघात दाखल होईल.