IPL स्पर्धेदरम्यान स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेला क्रिकेटपटू श्रीसंतयाला अखेर BCCI कडून मंगळवारी दिलासा मिळाला. लोकपाल डी. के. जैन यांनी त्याच्यावरील आजीवन बंदी हटवून त्याला ७ वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली. त्यानुसार सप्टेंबर २०२० ला त्याच्या बंदीचा कालावधी संपत आहे. त्यानंतर श्रीसंत पुन्हा एकदा टीम इंडियाकडून खेळताना दिसू शकतो. याबाबत बोलताना श्रीसंतने त्याला एक खास शतक साजरं करायचं असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.

स्पॉट फिक्सिंग प्रकरण – अखेर श्रीसंतवर BCCI मेहेरबान

“लोकपाल आणि BCCI यांनी माझ्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे मला आनंद झाला आहे. कठीण प्रसंगात माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेल्या माझ्या सगळ्या चाहत्यांचे मी आभार मानतो. मी आता ३६ वर्षांचा आहे. माझ्यावरील बंदीचा कालावधी संपेपर्यंत मी ३७ वर्षांचा होईन. मी कारकिर्दीत ८७ बळी टिपले आहेत. त्यामुळे मला टिम इंडियात परतून बळींचं शतक साजरं करायचंय. तसेच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळण्याचीही मला कायम इच्छा होती”, असे श्रीसंत म्हणाला. तसेच पुढील किमान पाच वर्षे तरी मी क्रिकेटला अलविदा करणार नाही असेही त्याने स्पष्ट केले आहे.

जाणून घ्या काय होतं श्रीसंतचं ‘स्पॉट फिक्सिंग कनेक्शन’

सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतची बाजू ऐकून घेऊन त्यावर ३ महिन्याच्या आत पुनर्विचार करण्याचे आदेश BCCI ला १५ मार्च २०१९ रोजी दिले होते. त्यानंतर  हे श्रीसंतबद्दल निर्णय घेतील असा निर्णय BCCI ने घेतला होता. त्यानुसार मंगळवारी त्याच्यावरील आजीवन बंदी हटवण्यात आली असून त्याला २०२० मध्ये क्रिकेटच्या मैदानावर परतता येणार आहे.

श्रीसंतने आपल्या उमेदीच्या काळातील बराचसा काळ मैदानाबाहेर घालवला असून जवळपास ६ वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगली आहे. त्यामुळे त्याच्यावरील आजीवन बंदी उठवून त्याला ७ वर्षांच्या बंदीची शिक्षा देण्यात आली आहे. त्याच्या या बंदीचा कालावधी सप्टेंबर २०२० मध्ये पूर्ण होईल. त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानावर परतू शकतो, असे निरीक्षण लोकपाल डी के जैन यांनी नोंदवले.