भारतीय दृष्टिहीन संघाने विश्वचषक जिंकून अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्यांच्या राष्ट्रीय दृष्टिहीन क्रिकेट संघटनेला (सीएबीआय) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मान्यता द्यावी व त्यांना मंडळाच्या निवृत्तिवेतन योजनेचा लाभ द्यावा, असे आवाहन भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने केले आहे.

सचिनने याबाबत बीसीसीआयच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद राय यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्याने म्हटले आहे की, ‘‘सलग चौथ्यांदा भारतीय संघाने दृष्टिहीन खेळाडूंच्या विश्वचषक स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले आहे. हे खेळाडू अतिशय संघर्ष करत क्रिकेट खेळतात. त्यांनी मिळवलेले विजेतेपद केवळ दृष्टिहीन खेळाडूंसाठी नव्हे तर अन्य खेळाडूंसाठीही प्रेरणादायक आहे. यापूर्वी मंडळाने दृष्टिहीन खेळाडूंना सहकार्य केले होते. पुन्हा तसेच सहकार्य करताना निवृत्तिवेतनाचा त्यांना फायदा दिला पाहिजे.’’

सीएबीआयला मान्यता दिली तर दृष्टिहीन खेळाडूंचे अनेक प्रश्न सुटतील. तसेच नवोदित दृष्टिहीन खेळाडूंनाही या खेळात कारकीर्द घडवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असेही सचिनने सांगितले.