मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या दोनशेव्या कसोटी सामन्याच्या यजमानपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. परंतु भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने हा ऐतिहासिक सामना मुंबईतच व्हावा, असे मत प्रदर्शित केले आहे.
‘‘भावनिकदृष्टय़ा विचार केल्यास सचिनचा दोनशेवा सामना मुंबईत झाला, तर ते महत्त्वाचे ठरेल. त्याचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी सारे मुंबईतच आहे,’’ असे गांगुलीने सांगितले.
‘‘या क्षणी तरी दोनशे कसोटी सामन्यांचा विक्रम मोडणे, ही अशक्यप्राय गोष्ट वाटत आहे. त्यामुळे हा सचिनसाठी सर्वोच्च क्षण आहे. आपण सर्व मंडळी तिथे असू, अशी आशा बाळगू. सचिनला दोनशेव्या सामन्यासाठी खेळताना पाहणे म्हणजे पर्वणी ठरणार आहे. हा क्षण पुन्हा अवतरणार नाही,’’ असे तो पुढे म्हणाला.