रिओ ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर साक्षी मलिकला हरियाणा सरकारने बक्षिसाची मोठी रक्कम जाहीर केली होती. अद्यापही ती रक्कम आपल्याला मिळाली नसल्याचे साक्षी मलिकने म्हटले आहे.  सरकारने केलेल्या घोषणा या केवळ दिखाव्यापुरत्याच होत्या.

माध्यमांसमोर आपला बोलबाला व्हावा याकरता हरियाणा सरकारने या घोषणा केल्या होत्या असे तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. आपल्या या पोस्टमध्ये तिने क्रीडा मंत्री विजय गोयल, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खत्तर आणि अनिल वीज यांना टॅग केले आहे.

मी माझे पदक आणण्याचे वचन पूर्ण केले परंतु सरकारने त्यांचे वचन पूर्ण केले नाही असे तिने या ट्विटमध्ये म्हटले आहे. सुवर्णपदक जिंकणाऱ्या व्यक्तीस ६ कोटी, रजत पदक जिंकणाऱ्यास ४ कोटी आणि कांस्य पदक जिंकणाऱ्यास २.५ कोटी रुपये देऊ असे वचन दिले होते.

ज्यावेळी साक्षी मलिकने कांस्यपदक जिंकले होते त्यानंतर तिचे भारतात भव्य स्वागत करण्यात आले होते. त्यावेळी तिला साडे तीन कोटी रुपये देऊ असे हरियाणा सरकारने म्हटले होते. परंतु अद्यापही हे वचन पूर्ण करण्यात आले नाही त्यामुळे आपल्या भावनांना तिने ट्विटद्वारे वाट मोकळी करून दिली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने ५८ किलोच्या गटात कांस्यपदक पटकवले होते.

दरम्यान, साक्षी मलिकने केलेले आरोप अनिल वीज यांनी फेटाळून लावले आहेत. तिने पदक जिंकल्यानंतर आम्ही तिला अडीच कोटी रुपयांचा चेक दिला होता. त्यावेळी तिने एमडी विद्यापीठामध्ये आपणास नोकरी हवी आहे असे म्हटले होते. तिथे तिच्यासाठी एक जागा तयार करण्यात आली होती असे त्यांनी म्हटले होते. मग आता का तक्रार करत आहे असे त्यांनी म्हटले आहे.

सरकारने केलेल्या घोषणेनुसार तिला साडे तीन कोटी रुपये मिळायला हवे होते परंतु अनिल वीज यांच्या म्हणण्यानुसार तिला केवळ अडीच कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळेच तिने हे ट्विट केले असावे असे म्हटले जात आहे. तिच्या या विधानानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.