ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला असला तरी गेल्या वर्षभरात परदेशी दौऱ्यांमध्ये भारतीय संघाचा फलंदाजीबाबतचा दृष्टिकोन कमालीचा सुधारला आहे, असे मत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले. तो म्हणाला, ‘‘पहिल्या दोन सामन्यांत केवळ २० षटकांच्या खेळात खराब कामगिरी केल्याचा फटका भारतीय संघाच्या निकालाला बसला. फलंदाजांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन खेळ केला तर भारतीय संघ नक्कीच विजयी होईल. चांगल्या चेंडूवर फटकेबाजी करण्याचा मोह खेळाडूंना आवरायला हवा.’’