शाहबाझ नदीमच्या फिरकीपुढे वेस्ट इंडिज ‘अ’ संघाचा डाव गडगडला

नॉर्थ साऊंड (अँटिग्वा) : भारत ‘अ’ संघाने वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवले. शाहबाझ नदीमच्या फिरकीच्या बळावर वेस्ट इंडिज ‘अ’ संघाचा पहिला डाव २२८ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारत ‘अ’ संघाने दिवसअखेर एक बाद ७० अशी दमदार मजल मारली. सलामीवीर प्रियांक पांचाळ (३१*) आणि शुभमन गिल (९*) दुसऱ्या दिवशी भारताच्या डावाला पुढे प्रारंभ करतील.

सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिज ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करली. परंतु भारताच्या वेगवान आणि फिरकी माऱ्यापुढे त्यांची ५ बाद ९७ अशी अवस्था झाली. परंतु रहकीम कॉर्नवॉल (५९) आणि जेर्मानी ब्लॅकवूड (५३) यांनी सहाव्या गडय़ासाठी ९८ धावांची भागीदारी करून संघाला दोनशेचा टप्पा ओलांडून दिला. डावखुरा फिरकी गोलंदाज नदीमने २२ षटकांत ६२ धावांत विंडीजचा निम्मा संघ गारद केला, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि लेग-स्पिनर मयांक मरकडेने प्रत्येकी दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

वेस्ट इंडिज ‘अ’ (पहिला डाव) : ६६.५ षटकांत सर्व बाद २२८ (रहकीम कॉर्नवॉल ५९, जेर्मानी ब्लॅकवूड ५३; शहबाझ नदीम ५/५२)

भारत ‘अ’ (पहिला डाव) : २२ षटकांत एक बाद ७० (प्रियांक पांचाळ नाबाद ३१, अभिमन्यू ईश्वरन २८; जोमेल वॉरिकन १/९)

२२-७-६२-५