व्हाईटवॉशच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला तिसऱ्या टी-२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. १२ धावांनी बाजी मारत ऑस्ट्रेलियाने टी-२० मालिकेचा शेवट गोड केला. तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी गलथान खेळी केली. ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे अनेक सोपे झेल खेळाडूंनी सोडले.

१७ व्या षटकात शार्दुल ठाकूर गोलंदाजी करत असताना मॅक्सवेलने मारलेला उंच फटका दीपक चहरच्या दिशेने गेला. परंतू दीपकने अत्यंत सोपा झेल सोडत मॅक्सवेलला जीवदान दिलं. हातात आलेली विकेट सोडल्यानंतर निराश झालेल्या शार्दुलच्या चेहऱ्यावरचे भाव यावेळी पाहण्यासारखे होते.

ग्लेन मॅक्सवेलनेही आपल्याला मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. ३६ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह मॅक्सवेलने ५४ धावा केल्या. अखेरच्या षटकात टी. नटराजनने त्याला माघारी धाडलं.