२४ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने काल भारतीय संघाची घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनी भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. मात्र आगामी विश्वचषक लक्षात घेता रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीला या दौऱ्यात विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

२४ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या २ टी-२० सामन्यांच्या मालिकेत मुंबईकर रोहित शर्माला विश्रांती दिली जाण्याची शक्यता असून, त्याच्या जागेवर लोकेश राहुलला भारतीय संघात शिखर धवनसोबत संधी दिली जाऊ शकते. याचसोबत २ मार्चपासून सुरु होणाऱ्या वन-डे मालिकेच्या अखेरच्या टप्प्यात शिखर धवनला विश्रांती दिली जाऊ शकते.

अवश्य वाचा – ‘या’ ३ कारणांमुळे मुंबई इंडियन्सचा मयांक मार्कंडे भारतीय संघात

या दोन्ही खेळाडूंच्या अनुपस्थिती लोकेश राहुल आणि ऋषभ पंत या खेळाडूंकडे संघातलं आपलं स्थान पक्क करण्याची चांगली संधी आहे. २०१८ हे वर्ष लोकेश राहुलसाठी चांगलं गेलं नव्हतं. मात्र भारत अ संघाकडून लोकेशने चांगली खेळी केली. त्यामुळे प्रत्यक्ष सामन्यात संघ व्यवस्थापन कोणत्या खेळाडूला संघात जागा देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – विश्वचषकासाठी संभाव्य १८ खेळाडूंची यादी तयार – एम.एस.के. प्रसाद